आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:28+5:302021-03-22T04:27:28+5:30
तळोदा शहरात स्वच्छतेची मागणी तळोदा : शहरातील विविध भागांत पडून असलेला कचरा उचलण्याची मागणी नागरिकांची आहे. याबाबत नागरिकांनी अनेक ...

आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम
तळोदा शहरात स्वच्छतेची मागणी
तळोदा : शहरातील विविध भागांत पडून असलेला कचरा उचलण्याची मागणी नागरिकांची आहे. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा सूचित करूनही कारवाई करण्यात आलेली नाही. शहरातील गटारींची स्वच्छता करण्यास टाळाटाळ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सांडपाणी अडकून असल्याने डासांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
हातपंप लावण्यासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा
अक्कलकुवा : तालुक्यातील गावपाड्यांवर यंदा पाणीटंचाई राहणार असल्याची शक्यता आहे. यामुळे पाड्यांवर हातपंप नव्याने लावण्याची मागणी करण्यात आली आहे. जुनाट हातपंप दुरुस्त होणे शक्य नसल्याने जिल्हा परिषदेने नवीन हातपंप देण्याची गरज आहे.
हायमास्टचा प्रश्न मार्गी लावा
धडगाव : तालुक्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये हायमास्ट आणि पथदिवे नादुरुस्त झाले आहेत. संबंधित ठेकेदाराने मंजूर केल्यानंतर सहा महिनेही हे पथदिवे व हायमास्ट पूर्ण क्षमतेने चालू शकले नाहीत, यामुळे त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा नवीन हायमास्ट लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आरोग्य केेंद्राच्या आवारातील अंधारामुळे सर्पदंशाची भीती आहे.
कोरड्या झाडांमुळे अपघातांचा धाेका
नंदुरबार : गुजरात राज्यातील वाका ते नंदुरबार दरम्यान कोरड्या झाडांचा प्रश्न कायम आहे. ही झाडे कोसळून अपघात होण्याची भीती आहे. यापूर्वी या झाडांना आगी लावून ती कोरडी करण्यात आली आहेत. ही झाडे प्रशासनाने काढून त्या जागी वृक्षारोपण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पूर्व भागात लांडग्यांचा संचार वाढला
नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागातील न्याहली ते कोपर्लीपर्यंतच्या वनक्षेत्रातील टेकड्यांवर लांडग्यांचा झुंड फिरताना दिसून येत आहे. या भागात अनेकांची शेती असून शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत वनविभागानेही शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
मिरची पथारींवरील कामे अंतिम टप्प्यात
नंदुरबार : मिरची खरेदी-विक्रीचा हंगाम आटोपता झाला असून शहरातील मिरची पथारींवर व्यापाऱ्यांकडून अंतिम टप्प्यांची कामे सुरू आहेत. सुकवलेली मिरची कारखान्यांमध्ये पाठवण्यासह इतर कामांना सध्या गती देण्यात येत आहे. यंदा मिरची उत्पादन चांगले असले तरी रोग व इतर कारणांमुळे पथारीवर आवक कमी राहिली होती. यातून दर काही अंशी वाढल्याची माहिती देण्यात आली आहे.
जलसाठ्यांचे पाणी सिंचनासाठी द्यावे
शहादा : तालुक्यातील धरणे व गावतलावांमध्ये अद्यापही मुबलक पाणीसाठा आहे. या पाण्याचा वापर शेतीसाठी व्हावा यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. यामुळे जलसंपदा विभागाने धरणातील पाणी द्यावे यासाठी शेतकरी प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे.
नंदुरबार बाजारात टरबुजांची आवक
नंदुरबार : ऊन वाढू लागताच बाजारानेही कूस बदलली असून उन्हाळी टरबूज दाखल होऊ लागले आहेत. व्यापारी शेतबांधावर जाऊन टरबुजांची खरेदी करत असल्याची माहिती आहे. यातून आवक वाढली आहे.