शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST2021-04-13T04:29:03+5:302021-04-13T04:29:03+5:30
वाहतूक बंद असल्याने पायपीट नंदुरबार जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत लॅाकडाऊन लागू करण्यात आले असल्याने आठवड्यातील चार दिवस जनता कर्फ्यू व ...

शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेले बरे
वाहतूक बंद असल्याने पायपीट
नंदुरबार जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत लॅाकडाऊन लागू करण्यात आले असल्याने आठवड्यातील चार दिवस जनता कर्फ्यू व तीन दिवस अत्यावश्यक सेवा चालू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बससेवा व खासगी वाहने बंद असल्याने स्थलांतरीत कामगारांना गावी परतण्यासाठी वाहने उपलब्ध होत नसल्याने पायपीट करावी लागत आहे.
गेल्या वर्षी अचानक लॅाकडाऊन जाहीर करण्यात आल्याने स्थलांतरीत कामगारांच्या मनात यंदा धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारच्या हालचाली लक्षात घेऊन स्थलांतरीत कामगारांचे गावाकडे पलायन सुरू झाले आहे.
गेल्या वर्षाचे अनुभव वाईट
गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने कामगारांना १५० ते २०० किलोमीटर दिवस रात्र चालत गावी यावे लागले होते. त्यामुळे गेल्या वर्षाची पुनरावृत्ती होऊन नये. म्हणून कामगार मिळेल, तशी व्यवस्था करून गावाकडे परत निघत आहेत.
गेल्या वर्षातील लॉकडाऊनच्या भीतीपोटी आम्ही गावी निघून आलो. अर्धवट काम सोडून गावी आलो. मालकांनी कामाचे पैसेही पूर्ण दिले नाहीत. काम झाल्यावर पैसे मिळणार असे वारंवार सांगितले आहे. कुटुंबाला सुरत येथून घेऊन आलो आहे. सध्या जंगलात जाऊन महू गोळा करत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.
- किसन गावित, कामगार, विसरवाडी
सुरत येथे आम्ही गवंडी कामासाठी गेलो. महाराष्ट्रीयन मजूर असल्याने वेगळी वागणूक दिली जाते. तुमच्या महाराष्ट्रात कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत आहे. तुमच्यापासून भीती वाटते. काम बंद करून गावी जा, असे सांगितल्याने आम्ही गावी आलो.
- विनायक गावित, मजूर, चिंचपाडा
महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी लॉकडाऊन होऊ शकते. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने खाण्यापिण्याचे वांदे झाले होते. म्हणून लाॅकडाऊन लागण्याच्या आधीच गावी आलो आहोत.
अमृत वळवी, मजूर, विसरवाडी