काँग्रेसच्या बेरजेच्या राजकारणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:40 PM2020-01-18T12:40:50+5:302020-01-18T12:41:11+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या राजकारणात काँग्रेसचाच वरचष्मा राहिल्याचे स्पष्ट झाले असून ...
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या राजकारणात काँग्रेसचाच वरचष्मा राहिल्याचे स्पष्ट झाले असून पक्षाने बेरजेचे समीकरण सुरू केले आहे. दुसरीकडे निकालानंतर केवळ सात सदस्य मिळविणा:या शिवसेनेने आपल्याकडे संपूर्ण राजकारण केंद्रीत केले होते, मात्र त्याच पक्षाला उपाध्यक्षपदासाठी विरोधाचा सामना करावा लागला असल्याने त्यातून भविष्यातील राजकारणाचे अनेक संकेत मिळाले आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर गेल्या 10 दिवसांपासून सत्तेच्या राजकारणाची चर्चा वेगवेगळ्या अंगाने चर्चिली जात होती. विशेषत: शिवसेनेच्या पाठींब्यावरच सत्तेचे समीकरण अवलंबून होते. या पक्षाने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांबरोबर सत्तेसाठी बोलणी सुरू केल्याने सत्तेचे सस्पेन्स अखेर्पयत राहिले. शेवटच्या क्षणी शिवसेनेने काँग्रेसला पाठींबा दिल्याचे उघड झाल्यानंतर भाजपचा रोष शिवसेनेवरच येणे स्वाभाविकच आहे.
अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी यांच्या कन्या सीमा वळवी यांनी तर भाजपतर्फे डॉ.कुमुदिनी विजयकुमार गावीत यांनी अर्ज भरला होता. तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे अॅड.राम चंद्रकांत रघुवंशी व भाजपतर्फे जयश्री दीपक पाटील यांनी अर्ज भरला होता. ज्यावेळी मतदान घेण्याची वेळ आली तेव्हा भाजपने अध्यक्षपदासाठी माघार घेत केवळ उपाध्यक्षपदाची मागणी केली. वास्तविक भाजपला आपल्याकडे संख्याबळ नाही याची जाणीव झाली असतानाही उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी करणे म्हणजे या पदासाठी असलेले शिवसेनेचे उमेदवार अॅड.राम चंद्रकांत रघुवंशी यांनाच बिनविरोध न होऊ देण्याचे संकेत होते आणि तसे केलेही. या घटनेतून ख:या अर्थाने जिल्ह्याच्या भविष्याच्या राजकारणाचे अनेक संकेत मिळाले आहेत.
विधानसभा निवडणुकीत डॉ.विजयकुमार गावीत व चंद्रकांत रघुवंशी यांनी आपली राजकीय युती भविष्यात काहीही झाले तरी तुटणार नाही, असा संकल्प दोन्ही नेत्यांनी केला होता. पण अवघ्या दोनच महिन्यात दोघांच्या दिशा वेगवेगळ्या होत असताना दिसू लागल्या आहेत. जि.प. निवडणुकीच्यावेळी राम रघुवंशी यांच्या विरोधात अर्ज भरणा:या भाजपचे उमेदवार रवींद्र गिरासे यांचा जातीचा दाखल्याच्या मुद्यावरुन सुरुवातीला अर्ज अवैध ठरला होता. त्यावेळी डॉ.गावीत यांनी राम रघुवंशी यांना बिनविरोध करण्यासाठी ही खेळी केल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर खासदार डॉ.हीना गावीत यांनी सूत्रे हाती घेत आणि कायद्याची लढाई करून सायंकाळर्पयत गिरासे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला होता. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातही भाजपचा एक गट तेथे अधिक सक्रीय होता. या घटनेतून अनेक तर्कवितर्क लावले गेले. अध्यक्षपदाच्या निवडीच्यावेळी शिवसेना भाजपलाच पाठींबा देणार व डॉ.कुमुदिनी गावीत अध्यक्ष होतील, असाही कयास लावला जात होता. परंतु गेल्या 10 दिवसांच्या राजकीय खेळीत गावीत आणि रघुवंशी परिवारात पुन्हा कटूता येत असल्याचे चित्र आहे. अर्थात राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र व शत्रू नसतो हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. त्याच सत्याचा अनुभव सध्या जिल्हावासीही घेत आहेत.
उपाध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक अनेक अर्थाने चर्चिली जात आहे. त्यात आदिवासी आणि बिगर आदिवासी वादातीत मुद्यालाही तोंड फुटले आहे. कारण अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी होते. त्यामुळे ते पद बिनविरोध झाले. तर दुसरीकडे उपाध्यक्षपदासाठी दोन्ही उमेदवार बिगर आदिवासी असल्याने त्यासाठी निवडणूक घेण्यात आली, अशीही चर्चा काही जाणकार करीत आहेत.
एकूणच या सा:या राजकारणात काँग्रेसचा मात्र बेरजेचे राजकारण सुरू झाले आहे. कारण विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अॅड.पद्माकर वळवी यांच्या कन्येला अध्यक्षपदाची संधी देऊन वळवी यांना राजकीयदृष्टय़ा अधिक सक्षम करण्याचे व शहादा विधानसभा मतदारसंघात आपली राजकीय ताकद वाढविण्याची काँग्रेसची खेळी स्पष्ट दिसून येते. यातून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीही थांबणार आहे.