निराधारांचे आधार ठरतेय तळोद्यातील अन्न छत्र परिवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:28 IST2020-04-12T13:28:35+5:302020-04-12T13:28:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोना महामारीने जनमनावर अक्षरश: दहशत पसरविली असून, नुसते त्याचे नाव काढले तरी मनाचा थरकाप ...

निराधारांचे आधार ठरतेय तळोद्यातील अन्न छत्र परिवार
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : कोरोना महामारीने जनमनावर अक्षरश: दहशत पसरविली असून, नुसते त्याचे नाव काढले तरी मनाचा थरकाप होतो. मात्र अशा भयानक परिस्थितीत ही तळोद्यातील अन्नछत्र परिवारातील शिलेदार आपल्या जीवाची बाजी लावत शहरातील रंजल्या गांजल्यांना मदतीचा हात देत आहेत. त्यांच्या या मदतीमुळे तरी निदान कुटुंबाची एकवेळची पोटाची खळगी भरली जात आहे. तरूणांच्या या कामाचे समाजातून कौतुक केले जात आहे.
कोरोना या महामारीने संपूर्ण जगात अक्षरश: कहर केला आहे. त्यामुळे त्याचा अधिक प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र शासनाने २१ दिवसांचा लॉकडाऊन संपूर्ण देशात लागू केला आहे. साहजिकच शहरातही संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अगदी हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांनाच त्यांची अधिक झळ बसत आहे. कारण कामेच ठप्प झाल्यामुळे ते कामावरही जावू शकत नाही. परिणामी कामधंद्याअभावी रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊन पोटाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात शासनाबरोबरच, सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींकडून अशा कुटुंबांना मदतीचा ओघ होत असला तरी ही, मदत संबंधित कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी संतोष माळी व पूतन दुबे हे तरूण महामारीची तमा न बाळगता जीवाचे रान करत मेहनत घेत आहेत. सकाळी लवकर उठून एकाठिकाणी बसून दिवसभराच्या कामकाजाचे नियोजन करतात. दानशूर व्यक्ती, संस्थांकडून मिळालेले गहू, तांदूळ, तेल आदी जीवनावश्यक वस्तु त्यांच्या घरी जावून आणणे व एका गोडावूनमध्ये त्याची पिशवीत समप्रमाणात पॅकींग करून प्रत्यक्ष गरीब कुटुंबांना घरपोच देतात.
शहरातील साधारण पावणे चारशे गरीब कुटुंबांना मदत होत आहे. यासाठी तरूणांनी ‘अन्न छत्र परिवार’ असा ग्रुप स्थापन करून मदतीचे आवाहन करीत असतात. त्यांच्या आवाहनास शहरातील दात्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते सांगतात. रस्त्यावरील बेघर असलेल्यांनादेखील ते शासनाच्या शिवभोजन थाळीचा लाभ जागेवरच मिळवून देत आहेत. अशा ४० भुकेल्यांची पोटाची खळगी भरली जात आहे.
आमलाड वसतीगृहातील विलगीकरण कक्षातदेखील ते रूग्णांना पिण्याचे फिल्टर पाणी उपलब्ध करून देत आहे. वास्तविक कोरोनाच्या महामारीने संपूर्ण समाजावर भितीचे वातावरण आहे. अशा भयानक वातावरणात कुणीही अस काम करण्यास धजावत नाही. मात्र या दोन्ही शिलेदारांनी सामाजिक दृष्टीकोन समोर ठेवून आणिबाणीच्या परिस्थितीत दिन दुबळ्यांची सेवा करण्याचा निर्धार केला आहे. त्याचे हे प्रामाणिक कार्य पाहून प्रशासनानेदेखील त्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती केली आहे. हे दोघ तरूण नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. महामारीच्या अशा कठिण परिस्थितीत जीवनावश्यक व अन्न मिळत असल्याने शहरातील गरीब कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोना या महामारीची हातावर पोट भरणाºया कुटुंना मोठ्या प्रमाणावर झळ बसली आहे. कामधंद्या अथवा पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही दोघं मित्रांनी सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांना मदतीचे आवाहन केले. त्यानंतर मदतीचा ओघदेखील मोठ्या प्रमाणात वाढला. त्यांनी दिलेल्या मालाचे योग्य नियोजन करून अशा गरजू कुटुंबांना प्रत्यक्ष घर पोहोच करत आहोत. प्रशासनाचेदेखील आम्हाला मार्गदर्शन व मदत मिळत आहे. गरीब कुटुंबांना शासनाबरोबरच दानशूरांची मदत मिळत असल्याने ते समाधान व्यक्त करतात.
-संतोष माळी, तळोदा