कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर बँका झाल्या मेहेरबान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST2021-03-21T04:29:01+5:302021-03-21T04:29:01+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात २०२०-२१ या वर्षाच्या खरीप हंगामात ३९ टक्के पीक कर्जवाटप राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा बँकेकडून करण्यात आले ...

कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर बँका झाल्या मेहेरबान
नंदुरबार : जिल्ह्यात २०२०-२१ या वर्षाच्या खरीप हंगामात ३९ टक्के पीक कर्जवाटप राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा बँकेकडून करण्यात आले होते. शासनाने गेल्या वर्षात २५ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळून पीक कर्जही मिळाले होते.
महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यात एकूण २५ हजार २२ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती गेल्या वर्षात मिळून त्यांचे १८ कोटी ९२ लाख रुपयांचे कर्ज शासनाने फेडून टाकले होते. यातून या शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज मिळणे सुलभ झाले होते. परिणामी यंदाही कर्जवाटपात वाढ हाेण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पीक कर्ज वाटपाबाबतची बैठक अद्याप व्हायची आहे. या बैठकीत बँकांचे २०२१-२२ या वर्षातील पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवले जाणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत बैठक होऊन कर्जाचे उद्दिष्ट ठरणार आहे. यानंतर कर्जवाटपाला सुरुवात होणार आहे. ज्या शेतकरी बांधवांनी गेल्या वर्षाच्या कर्जाची परतफेड केली असेल त्यांना तातडीने कर्ज मिळेल.
- जयंत देशपांडे, व्यवस्थापक, लीड बँक, नंदुरबार
शासनाकडून कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्याने पीक कर्ज वेळेवर मिळाले होते. यंदाही बँकांनी कर्ज वितरण एप्रिलपासून सुुरू करण्याची गरज आहे. यंदाचा खरीप हंगाम लवकर सुरू होणार आहे.
- वकील पाटील, शेतकरी, शनिमांडळ
कर्जमुक्ती मिळाल्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. गेल्या वर्षात पीक कर्जही वेळेवर मिळाले होते. त्याचा भरणा करून यंदा नव्याने कर्ज घेण्याचा मानस आहे.
- ज्ञानेश्वर पाटील, शेतकरी, शनिमांडळ
२०१६ ते २०२० या पाच वर्षांतील सर्वाधिक कर्जवाटप हे २०२० मध्ये झाले आहे. दरवर्षी उद्दिष्टाच्या ११ ते १२ टक्के पीक कर्जवाटप करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांनी गेल्या वर्षात २७३ कोटी रुपयांचे पीक कर्ज २५ हजार शेतकऱ्यांना केले होते.