तळोद्यात रूग्ण वाढत असल्याने भितीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:37 IST2020-06-25T12:37:29+5:302020-06-25T12:37:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाच्या टेस्टींगसाठी गेल्या शुक्रवारी १६ जणांना जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यापैकी १७ जणांचे ...

तळोद्यात रूग्ण वाढत असल्याने भितीचे वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : कोरोनाच्या टेस्टींगसाठी गेल्या शुक्रवारी १६ जणांना जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यापैकी १७ जणांचे स्वॅब निगेटीव्ह आल्यामुळे तळोदेकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळी मोठा माळी वाड्यातील एका ३० वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अडीच पावणे-तीन महिन्यापर्यंत तळोद्यात कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता. तथापि ठाणे रिटर्न मयत महिलेच्या कोरोना संदिग्ध लक्षणांमुळे तिच्या मुलाचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. तेथूनच शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबाबरोबर सात जणांचे अहवाल पुन्हा १८ जून रोजी पॉझिटीव्ह आले होते. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. प्रशासनाने हे रूग्ण आढळले तो परिसर म्हणजे मोठा मोळीवाडा, शिवराम नगर हे दोनभाग कंटेनमेन्ट झोन म्हणून घोषित केले आहे.
याठिकाणी नियमितपणे आारेग्य विभाग, पालिका कर्मचारी तळ ठोकून आहेत. तेथील ३१ जणांना आरोग्य यंत्रणेने संस्थात्मक क्वॉरंटाईन करून त्याची कोरोना टेस्टींगसाठी जिल्हा रूग्णालयात रवानगी करण्यात आली होती. त्यापैकी आता पावेतो प्रशासनाला २५ अहवाल प्राप्त झाले आहे. त्यात यापूर्वीच सात जण पॉझिटीव्ह आहेत. तर उर्वरितांपैकी १८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रविवारी यातील ११ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. तब्बल ११ रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे तळोदेकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यातही एक-दोन जण हायरिस्क होते. कारण त्यांनी अनेकांशी थेट संपर्क केला होता. त्यामुळे या सगळ्यांचाच जीव टांगणीला होता. त्यांच्याच अहवालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून होते. सुदैवाने त्यांचा अहवाल निगेटीव्ह निघाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
सोमवारी सायंकाळी सात जणांचे अहवाल आले. त्यात मोठा माळीवाड्यातील ३० वर्षी महिला पॉझिटीव्ह आली असून, उर्वरित सहा जण निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने दोन्ही कंटेनमेंट झोनमधील साधारण ४८५ जणांना होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारून घरीच राहण्याची सूचना केली आहे. याशिवाय त्यांची नियमित आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाने १४ पथके नियुक्त केली असून, कर्मचाऱ्यांकडून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
दरम्यान, नगरपालिकेनेदेखील औषध फवारणी करून इतर सर्व प्रतिष्ठाने बंद केली आहेत. त्यामुळे दुपारी एक वाजेनंतर संपूर्ण शहरात शुकशुकाट दिसून येत आहे. दरम्यान सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे, पालिका मुख्याधिकारी सपना वसावा, पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंगोटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते आदी शहरात अधून-मधून भेट देत असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच दिवसापासून शहरात लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत मंगळवारी संपल्याने सलून, ब्युटीपार्लरची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.