आश्रमशाळा आजपासून गजबजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 11:55 IST2021-02-15T11:55:49+5:302021-02-15T11:55:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आश्रमशाळांमधील पाचवी ते आठवीच्या वर्गाची घंटा सोमवारपासून वाजणार आहे. त्यासाठी जिल्ह्यतील १३९ आश्रमशाळा सज्ज ...

आश्रमशाळा आजपासून गजबजणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आश्रमशाळांमधील पाचवी ते आठवीच्या वर्गाची घंटा सोमवारपासून वाजणार आहे. त्यासाठी जिल्ह्यतील १३९ आश्रमशाळा सज्ज झाल्या आहेत. काही आश्रम शाळांमध्ये विद्यार्थी दाखल झाले असून काही ठिकाणी विद्यार्थी आणण्यासाठी शिक्षकांना गावोगावी फिरावे लागत आहे. पालकांची संमतीपत्र देखील घेतले जात आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे देखील मोठे आव्हान राहणार आहे.
आश्रम शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग डिसेंबर महिन्यात सुरू झाले. सुरुवातीच्या काळात विद्यार्थी संख्या जेमतेम होती. नंतरच्या काळात ती वाढली, परंतु अद्यापही ती ६० टक्केच्या वर पोहचू शकली नाही. त्यामुळे पाचवी ते आठवीच्या वर्गातील उपस्थितीला कसा आणि काय प्रतिसाद राहील याकडे आता लक्ष लागून आहे.
तब्बल २२ हजार विद्यार्थी
जिल्ह्यात नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालय आहेत. दोन्ही प्रकल्प कार्यालये मिळून एकुण १३९ आश्रमशाळा चालविल्या जातात. याशिवाय निवासी इंग्रजी शाळांचाही समावेश आहे. या सर्व शाळांमध्ये जवळपास २२ हजारापेक्षा अधीक विद्यार्थी आहेत. नंदुरबार प्रकल्प कार्यालयाअंतर्गत शासकीय आश्रम शाळांमधील पाच हजार ८२३ तर अनुदानीत आश्रम शाळांमधील सहा हजार ७८६ विद्यार्थी आहेत.
विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
दाखल होणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचेे निश्चीत करण्यात आले आहे. त्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी, जवळचे उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामिण रुग्णालयाशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व आरटीपीसीआर कोविड चाचणी करण्याचे निर्देश आधीच देण्यात आले आहेत.
आणण्याची कसरत
विद्यार्थ्यांना आश्रम शाळेत आणण्याची मोठी कसरत राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना राजी करण्यात येत आहे. यासाठी गेल्या आठवडाभरापासून शिक्षक या मोहिमेवर लागले होते. पालकांकडून संमतीपत्र देखील भरून घेतले जात आहे.
आहार देणार
विद्यार्थ्यांना आहार शाळेतच पुरविण्यात येणार आहे. सेंट्रल किचनचा उपयोग केला जाणार आहे. काही ठिकाणी शाळांना स्थानिक ठिकाणी शिधा घेण्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य खरेदीसाठी त्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नंदुरबार जिल्ह्यात दोन प्रकल्प कार्यालय आहे. या दोन्ही कार्यालय मिळून एकुण १३९ आश्रमशाळा आहेत. त्यात ७४ शासकीय तर ६५ अनुदानीत आश्रम शाळांचा समावेश आहे. याशिवाय ४७ वसतिगृहे आहेत. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा विचार करता एकुण साडेआठ हजार विद्यार्थी आहेत. त्यांना दाखल करून घेण्याची कसरत राहणार आहे.
काय काळजी घेणार?
अधीग्रहीत होत्या त्या व बंद असलेल्या वसतिगृहे आणि आश्रमशाळा इमारतींचे संपुर्ण सॅनिटाईझेशन करण्यात आले असून स्वच्छता करण्यात आली आहे.
पाचवी ते आठवीच्या निवासी विद्यार्थ्यांना आणून त्यांची आरोग्य तपासणी करणार. पालकांकडून हमीपत्र भरून घेणार व आवश्यक काळजी घेणार.
शिक्षकांचीही आरोग्य तपासणी करणार. त्यासाठी आरोग्य विभागाची मदत घेणार. विद्यार्थ्यांच्या कोविड चाचणीसाठी पालकांना विश्वासात घेण्यात येत असून आरोग्यदृष्टया आवश्यक असल्याचे पटवून दिले जात आहे.
आहारासाठी सेंट्रलकिचनचा उपयोग करण्यात येणार आहे. शिवाय स्थानिक ठिकाणी शिधा खरेदीसाठी देखील परवाणगी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोना काळात दोन आश्रमशाळा व तीन वसतीगृहांच्या इमारती कोरोनासाठी आरक्षीत करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात त्या खाली करण्यात आल्या.