धान्यमालाची आवक आली अवघी ४० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST2021-05-07T04:32:16+5:302021-05-07T04:32:16+5:30

नंदुरबार : संचारबंदीच्या कालावधीत बाजार समितीत धान्यमालाची आवक कमालीची घटली आहे. सध्या हंगाम संपत आल्याने आवक कमी व भाव ...

The arrival of foodgrains was only 40 per cent | धान्यमालाची आवक आली अवघी ४० टक्क्यांवर

धान्यमालाची आवक आली अवघी ४० टक्क्यांवर

नंदुरबार : संचारबंदीच्या कालावधीत बाजार समितीत धान्यमालाची आवक कमालीची घटली आहे. सध्या हंगाम संपत आल्याने आवक कमी व भाव देखील स्थिर असल्याचे चित्र आहे. दरम्यान ११ वाजेची वेळमर्यादा असल्याने शेतकरी पहाटेच कृषी माल घेऊन बाजार समितीत दाखल होत असल्याचे दिसून येते.

गेल्यावर्षी लॅाकडाऊनच्या कालावधीत बाजार समितीदेखील बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे गहू, मका, कापूस, मिरची या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा लॅाकडाऊन नसला तरी संपूर्ण संचारबंदी असतानाही कृषी मालाच्या खरेदी-विक्रीला मुभा देण्यात आली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील सहाही बाजार समितींमध्ये आवक निम्म्यावर आली आहे. सद्यस्थितीत केवळ गहू, मका, भुईमूग, शेंगा, ज्वारी या मालाची आवक होत आहे. ती देखील ३० ते ४० टक्क्यांवर आली असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आवक कमी असली तरी भाव स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरणही आहे.

गव्हाचे भाव यंदा स्थिर राहिले. सद्यस्थितीत केवळ १६०० ते २२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यंदा आपण २० एकरवर गहू टाकला होता. भाव चांगला मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु कोरोना आणि संचारबंदीमुळे भाव फारसा मिळू शकला नाही.

-सुदाम पाटील, शेतकरी, नंदुरबार.

खरीप हंगाम यंदा अतिपावसाने कमी आला होता. रब्बी हंगामातदेखील अवकाळी पावसाने गहू, हरभरा व मकाला फटका बसला होता. भाव यंदा बऱ्यापैकी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली. नैसर्गिकसह मानवनिर्मित संकटाचा सामना करावा लागत आहे.

-वसंत जाधव, शेतकरी, शहादा.

हंगाम संपत आल्याने बाजार समितीत आवक कमी झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व लिलाव पार पाडले जातात. संचारबंदी काळात शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये यासाठी सर्व ती खबरदारी घेतली जाते.

-योगेश अमृतकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार.

Web Title: The arrival of foodgrains was only 40 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.