सर्वच पक्षाच्या प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:49 IST2019-12-25T12:49:52+5:302019-12-25T12:49:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी त्या त्या ...

सर्वच पक्षाच्या प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी त्या त्या तहसील कार्यालयात झाली. या वेळी काही ठिकाणी वाद झाले तर काही ठिकाणी शांततेत छाननी झाली. नंदुरबार तालुक्यात मात्र प्रतिष्ठेच्या असलेल्या कोपर्ली गटातील भाजप उमेदवाराच्या अर्जाबाबत वादविवाद उपस्थित झाले. अखेर सायंकाळी सुनावणी घेत अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरवला.
नंदुरबार तालुका
नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १० गटांसाठी सोमवारी अंतिम मुदतीअंती ८१ उमेदवारांनी १३१ अर्ज दाखल केले होते़ यातील दोन अर्ज अवैध ठरले़ परंतु अर्ज अवैध ठरले असले तरी हे अर्ज डमी असल्याने उमेदवार तेवढेच राहिले आहेत़ पंचायत समितीच्या २० गणांसाठी १०८ उमेदवारांकडून १६१ अर्ज दाखल करण्यात आले होते़ हे सर्व अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत़ कोळदे गटातील अनिता राजेंद्र चौधरी व खोंडामळी गटातून अनिल माधवराव पाटील या दोघांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले होते़ यातील प्रत्येकी एक अर्ज बाद झाला़ पातोंडा गटातून आठ उमेदवारांनी दाखलल केलेले अर्ज वैध ठरवण्यात आले़ या गटात भाजपातर्फे विजया प्रकाश गावीत, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यमुनाबाई गुलाब नाईक , काँग्रेसतर्फे पल्लवी काशिनाथ वळवी तर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कुमुदिनी विजयकुमार गावीत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता़ कोळदे गटातून दाखल करण्यात आलेले सर्व सात अर्ज वैध ठरवण्यात आले़ गटातून शिवसेनेतर्फे मनिषा संजय पाटील, भाजपातर्फे योगीनी अमोल भारती ह्या उमेदवारी करत आहेत़ खोंडामळी गटातून तब्बल १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ त्यापैकी अनिल पाटील यांचा एक अर्ज अवैध ठरला तर दुसरा वैध़ या गटातून राष्ट्रवादीतर्फे सागर सुधारक तांबोळी, काँग्रसेतर्फे राजेंद्र वसंतराव पाटील, शिवसेनेतर्फे मधुकर टिकाराम पाटील तर भाजपातर्फे शोभाबाई शांताराम पाटील यांनीही अर्ज दाखल केला आहे़ कोपर्ली गटात ५ जणांनी अर्ज दाखल केले होते हे सर्व अर्ज वैध ठरले़ शिवसेतर्फे अॅड़राम चंद्रकांत रघुवंशी यांनी तर भाजपातर्फे रविंद्र भरतसिंग गिरासे यांनी अर्ज दाखल केले आहेत़ रनाळे गटातून १२ उमेदवारांनी दाखल केलेल सर्व अर्ज वैध ठरले़ गटातून भाजपातर्फे संध्याबाई वकील पाटील, शिवसेनेतर्फे अरुणा दादाभाई पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत़ शनिमांडळ गटातून ११ अर्ज दाखल करण्यात आले होते़ हे सर्व अर्ज वैध ठरले राष्ट्रवादीतर्फे रेखा सागर तांबोळी, काँग्रेसकडून चंद्रकला सुधाकर तांबोळी, भाजपाकडून रुचिका प्रविण पाटील तर शिवसेनेकडून सिमा राकेश पाटील उमेदवारी करत आहेत़ नांदर्खे गटातून आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ हे सर्व अर्ज वैध ठरले़ भाजपातर्फे अर्चना शरद गावीत, काँग्रेसतर्फे जयमाला महिपाल गावीत निवडणूक लढवत आहेत़ धानोरा गटात चार उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज वैध ठरले़ काँग्रेसतर्फे कलुबाई विक्रमसिंग वळवी, भाजपातर्फे राजेश्री शरद गावीत यांनी अर्ज दाखल केले आहेत़ कोठली गटातून केवळ तीन अर्ज दाखल करण्यात आले होते़ तिघी अर्ज वैध ठरले़ भाजपातर्फे कुमुदिनी विजयकुमार गावीत ह्या उमेदवारी करत आहेत़ आष्टे गटातून १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ हे सर्व अर्ज वैध ठरवण्यात आले़ भाजपातर्फे हेमराज शामू कोकणी, काँग्रेसतर्फे देवमन तेजमल पवार तर राष्ट्रवादीतर्फे प्रकाश मोहन गांगुर्डे येथून उमेदवारी करत आहेत़ माजी सभापती दत्तू चौरे हेही यांचा अर्ज गटातून वैध ठरला असल्याने त्याकडे लक्ष लागून आहे़
शहादा तालुका
जिल्हा परिषदेच्या १४ जागांसाठी १०२ उमेदवारांचे १३१ तर पंचायत समितीच्या २८ जागांसाठी १४४ उमेदवारांचे १७३ अर्ज असे एकूण ३०४ अर्ज वैध ठरले. छाननीअंती जिल्हा परिषदेचे पाच व पंचायत समितीचा एक असे सहा अर्ज अवैध ठरविण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी जिल्हा परिषदेसाठी १३६ तर पंचायत समितीसाठी १७४ अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमक्ष दाखल अर्जाची छाननी करण्यात आली. यात जिल्हा परिषदेच्या खेडदिगर गटातील धुडकीबाई ठाणसिंग माळीच यांनी दाखल केलेला अपक्ष अर्ज अनामत रकमेची पावती व त्यावर स्वाक्षरी नसल्याने, कुढावद गटातील काँग्रेसच्या उमेदवार शितल मोहन शेवाळे यांचे वय २१ वर्षापेक्षा कमी असल्याने, पाडळदा गटातील काँग्रेसचे उमेदवार रामदास दगा कोळी यांचा अर्ज सूचक अन्य गटातील असल्याने, वडाळी गटातील शिवसेना उमेदवार चंद्रिका आत्माराम नगराळे याचा अर्ज अन्य गटातील सूचक असल्याने तसेच प्रकाशा गटातील काँग्रेसच्या उमेदवार मुरीबाई नरेंद्र पवार यांचा अर्ज गुजरात राज्यातील जात प्रमाणपत्र जोडल्याने बाद ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या जावदा त.बो. गणातील काँग्रेसचे उमेदवार हेमराज जगन्नाथ चौधरी यांचा अर्ज अन्य गटातील सूचक असल्याने बाद ठरविण्यात आला. छाननीअंती दाखल अर्जापैकी जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक अर्ज सुलतानपूर गटातून १४ उमेदवारांचे १९ तर सर्वात कमी लोणखेडा गटातून तीन उमेदवारांचे चार अर्ज शिल्लक राहिले आहेत. तर पंचायत समितीच्या २८ गणात सर्वाधिक अर्ज वडगाव गणात १० उमेदवारांचे १२ अर्ज तसेच सर्वात कमी खेडदिगर व मोहिदे त.ह. गणातून प्रत्येकी दोन उमेदवारांचे दोन अर्ज आहेत.
नवापूर तालुका
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नवापूर तालुक्यातील दोन उमेदवारांचे चार नामांकन सूचकाची स्वाक्षरी नसल्याच्या कारणावरुन रद्द ठरविण्यात आले. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १० गटांसाठी ४२ उमेदवारांनी ५१ नामांकन दाखल केले होते तर पंचायत समितीच्या २० गणांसाठी ८४ उमेदवारांनी ९५ नामांकन दाखल केले होते. दाखल झालेल्या नामांकन अर्जांची मंगळवारी छाननी करण्यात आली. त्यात खांडबारा गटातून किसन रामजी वळवी व करंजाळी गणातून हेमा प्रकाश पाडवी यांचे नामांकन सूचकाची स्वाक्षरी नसल्याच्या कारणावरुन रद्द ठरविण्यात आले. १० गटासाठी ४१ उमेदवारांचे व २० गणांसाठी ८३ उमेदवारांचे नामांकन वैध ठरविण्यात आले. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उमेदवार व त्यांचे सूचक छाननीप्रसंगी उपस्थित होते. दरम्यान, निवडणुकीसाठी क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना रविवारी पालिकेच्या बहुउद्देशिय नगरभवनात पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी दिली.
तळोदा तालुका
तळोदा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीच्या १० गणांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारीसाठी दाखल अर्जांची छाननी करण्यात आली. यात एकही अर्ज बाद न करता सर्व ९६ अर्ज वैध ठरले आहेत. विशेष म्हणजे अर्ज छाननीच्यावेळी कोणत्याच उमेदवाराने आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नामांकनाबाबत हरकत घेतली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच हरकतीविना सर्वच अर्ज मंजूर करण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान, अर्ज छाननीच्या दिवशी तालुक्यातील जनतेने मोठी गर्दी केली होती. नामांकन अर्ज दाखल करतांना डझनभरापेक्षा अधिक कागदपत्रांची सक्ती प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यातच उमेदवारांनी आपला अर्ज आॅनलाईन पद्धतीने दाखल केल्यामुळे काही किरकोळ त्रुटी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन कुणीच हरकत घेऊ नये, असे उमेदवारांमध्ये ठरल्याची चर्चा होती. जिल्हा परिषदेच्या पाच गटासाठी साधारण ३८ तर पंचायत समितीच्या १० गणांसाठी ५८ अशा एकूण ९६ अर्जांचा समावेश आहे. सर्वात जास्त नामांकन अर्ज बुधावल गटामध्ये दाखल झालेले आहेत. बोरद गटातही १० अर्ज दाखल आहेत. सर्वात कमी अर्ज प्रतापपूर, आमलाड गटात आहेत. या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी चार उमेदवारांचे अर्ज आहेत. गणांमध्ये बोरद गणात १० हर्ज आहेत. अमोनी गणातही नऊ अर्ज दाखल आहेत. अंमलपाडा व आमलाड गणात केवळ प्रत्येकी तीनच उमेदवारांचे अर्ज आहेत. काँग्रेस व भाजप या प्रमुख पक्षांकडूनच बहुसंख्य उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र गटासाठी पाच व गणांसाठी दहा अशा प्रत्येकी १५ उमेदवारांना पक्षांचे अधिकृत एबी फॉर्म देण्यात आले आहेत. साहजिकच इतर उमेदवारांचे अर्ज अपक्ष राहिले आहेत. सर्वच उमेदवारांच्या अर्जासोबत परिपूर्ण कामदपत्रे होते. त्यामुळे छाननीत कुणाचाच अर्ज बाद झाला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आता माघार घेण्याची मुदत ३० डिसेंबर रोजी आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना आपापल्या बंडखोरांची माघारीसाठी मनधरणी करावी लागणार आहे.
अक्कलकुवा तालुका
अक्कलकुवा तालुक्यातील १० गट व २० गणांसाठी मंगळवारी छाननीअंती गटात ९४ नामनिर्देशनपत्र वैध तर दोन अवैध ठरले आहेत. गणात १५६ नामनिर्देशन पत्र वैध तर तीन नामनिर्देशन पत्र अवैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कदम यांनी नामनिर्देशन पत्राची छाननी करून नामनिर्देशन पत्र वैध व अवैध ठरवले. या वेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार हरीश भामरे यांनी काम पाहिले. सकाळी ११