अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यास मका, तूर व बाजरी पिकाची पेरणी करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST2021-07-23T04:19:31+5:302021-07-23T04:19:31+5:30
जिल्ह्यातील नवापूर (२८.५० टक्के), तळोदा (२७.४०) व अक्क्लकुवा (२८.८०) या तालुक्यांत कमी पर्जन्यमान झाले असून २ लाख ९५ हजार ...

अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यास मका, तूर व बाजरी पिकाची पेरणी करण्याचे आवाहन
जिल्ह्यातील नवापूर (२८.५० टक्के), तळोदा (२७.४०) व अक्क्लकुवा (२८.८०) या तालुक्यांत कमी पर्जन्यमान झाले असून २ लाख ९५ हजार २१९ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी१९ जुलै अखेर २ लाख १५ हजार ४५० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. दरम्यान, धुळे येथील विभागीय विस्तार केंद्र व धुळे येथील महाबीजचे व्यवस्थापक यांनी आपत्कालीन पीक नियोजनासंदर्भात चर्चा करून पिकाचे नियोजन करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत. अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यास ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर मूग आणि १५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी होणार नाही असे अपेक्षित असताना त्याऐवजी शेतकऱ्यांना मका, तूर आणि बाजरीची पेरणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. भात पिकाची १५ ऑगस्टपर्यंत लावणी पद्धतीने उशिरा पाऊस झाला तरी पेरणी पूर्ण करावी. जिल्ह्यात ४-५ दिवसांत पाऊस झाल्यास विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे मका, तूर व बाजरी पिकांची लागवड करावी. खरीप पड क्षेत्र राहिल्यास त्यात ऑगस्ट उशिरापर्यंत ओवा व एरंडी पिकांची लागवड अपेक्षित आहे.
जुलै महिन्याअखेरपर्यंत अक्क्लकुवा व धडगाव तालुक्यात भगर पिकाची लागवड पूर्ण होईल असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.