बनावट लग्नप्रकरणी आणखी एकास अटक आरोपी संख्या नऊ, २७ पर्यंत कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST2021-05-25T04:34:51+5:302021-05-25T04:34:51+5:30
याबाबत पोलीस सूत्रानुसार, मंदाणे येथील एका युवकाशी लग्न करून अवघ्या १५ दिवसातच पळून जाऊन दुसऱ्याशी लग्न उरकून ...

बनावट लग्नप्रकरणी आणखी एकास अटक आरोपी संख्या नऊ, २७ पर्यंत कोठडी
याबाबत पोलीस सूत्रानुसार, मंदाणे येथील एका युवकाशी लग्न करून अवघ्या १५ दिवसातच पळून जाऊन दुसऱ्याशी लग्न उरकून करून लाखो रुपयांचा गंडा घालून तरुणी सोनू राजू शिंदे हिच्यासह त्यांच्या टोळीने फसवणूक केली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या टोळीने संपूर्ण खानदेशात अनेकांची फसवणूक केल्याचे उघड होऊ लागले आहे. मंदाणे येथील भूषण सैंदाणे याने फसवणुकीची फिर्याद दिल्याने तब्बल आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पाच जण जेलची हवा खात आहेत. या टोळीतील अटकेतील आरोपींना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर अजून एक आरोपीचे नाव उघड झाले आहे. त्यास पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश सोनवणे, हवालदार मिथुन शिसोदे, कृष्णा जाधव यांच्या पथकाने जामनेर तालुक्यातील शेवगाव पिंपरी शिवारातील एका शेतात दत्ता देवीदास लोणारे रा. वाशिम, हल्ली मुक्काम जामनेर यास शिताफीने अटक केली. दत्ता लोणारे या आरोपीसह अन्य अटकेत असलेल्या पाच जणांना सोमवारी २४ मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत २७ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. पैकी तरुणी पूजा उर्फ सोनू शिंदे हिची आई वंदना शिंदे यांना वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडी मिळाली असून जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. उर्वरित फरार असलेले मुख्य सूत्रधार बाबाराव आमले रा. औरंगाबाद, प्रीती कांबळे, रा. हिंगोली, भैरव शिंदे यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना होणार असून त्यांना लवकरच पकडले जाईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी व्यक्त केला आहे.
सर्वच समाजाने जागृतता बाळगावी
शेतकरी, व्यावसायिक तसेच बेरोजगार तरुणांना मुली मिळत नसल्याचा गैरफायदा घेऊन लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून लाख रुपये हडप करणाऱ्या दलालांच्या टोळ्या राज्यभरात सक्रिय असल्याची सर्वदूर चर्चा आहे. ह्या टोळ्या अशा तरुणांना जाळ्यात अडकून लग्नाचे आमिष दाखवून कशी लाखो रुपयांची लूट करतात व पद्धतशीरपणे कसे फसवतात हे मंदाने व अडावद येथील घटनेने उघड झाले आहे. त्यामुळे या घटनेवरून सर्व समाजाने विवाह जोडतांना सखोल माहिती घेऊन समक्ष खात्री करून कायदेशीर मार्ग अवलंबिला पाहिजे व जागृतता ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले.