लॉकडाऊन मा आमेन खाऊत काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:59+5:302021-04-01T04:30:59+5:30
मागील वर्षाच्या मानाने सध्याचा कोरोना हा आजार अधिक तीव्र झाला आहे. सद्य:स्थितीत प्रत्येक गावात कोरोनाचे पेशंट दिसून येत असून, ...

लॉकडाऊन मा आमेन खाऊत काय?
मागील वर्षाच्या मानाने सध्याचा कोरोना हा आजार अधिक तीव्र झाला आहे. सद्य:स्थितीत प्रत्येक गावात कोरोनाचे पेशंट दिसून येत असून, गेल्या १५ दिवसांत अनेक जणांचा बळीसुद्धा गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थिती पाहता निर्बंध लावले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही दररोज शेकडो पेशंट आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १ एप्रिल ते १५ एप्रिलदरम्यान पूर्णतः कडक लॉकडाऊनचा आदेश दिला आहे.
या निर्णयावर ग्रामीण भागात हातावर पोट भरणाऱ्या मजुरांकडून, त्याचप्रमाणे छोट्या व्यावसायिकांकडून उलट- सुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. कोरोना सध्या तरी न संपणारी प्रक्रिया आहे. आज निगेटिव्ह आलेली व्यक्ती उद्या पॉझिटिव्ह येऊ शकते. म्हणून सध्या तरी कोरोनाबरोबर जगावे लागेल, असे डब्ल्यू.एच.ओ.नेसुद्धा स्पष्ट केले आहे. एक वर्षापासून सर्व छोटे व्यवसाय, उद्योग-धंदे बंद आहेत. आता पुन्हा १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न सध्यातरी हातावर पोट भरणाऱ्यांना पडला आहे.
जे लोक लॉकडाऊन पाहिजे असे म्हणतात, ते एकतर नोकर वर्ग असतात किंवा त्यांची परिस्थिती खूपच चांगली असते. त्यामुळे ते घरी बसून आपला उदरनिर्वाह करू शकतात; पण हातावर पोट भरणाऱ्या व्यक्तीला संध्याकाळच्या काळात जेवणाची चिंता असते. तो जगणार कसा? जे लोक हातावर पोट भरणारे आहेत, त्यांना आपले पोट भरण्यासाठी लॉकडाऊन नको आहे. लॉकडाऊनमध्ये हातावर पोट भरणाऱ्यांनी जगावे तरी कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माझी पाणीपुरीची छोटी लॉरी असून, त्यावरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो. गेल्या वर्षी जवळजवळ चार ते पाच महिने लॉकडाऊनमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली होती. आता परत लॉकडॉऊन झाल्यामुळे पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
-कैलास रवींद्र माळी, जयनगर