रुग्णसंख्या घटली तरी मृत्युदर दोन टक्क्यांवर स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST2021-05-24T04:29:06+5:302021-05-24T04:29:06+5:30
नंदुरबार : गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या कमी झाली असली तर मृत्युदर हा सरासरी दोन टक्क्यांपर्यंत स्थिर आहे. ...

रुग्णसंख्या घटली तरी मृत्युदर दोन टक्क्यांवर स्थिर
नंदुरबार : गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या कमी झाली असली तर मृत्युदर हा सरासरी दोन टक्क्यांपर्यंत स्थिर आहे. दरम्यान, दोन महिन्यात जिल्ह्यात तब्बल ५३१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील नवापूर तालुक्याचा मृत्युदर हा सर्वाधिक ३.५६ टक्के तर सर्वात कमी शहादा तालुक्याचा १.६५ टक्के इतका आहे. नंदुरबार जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या जिल्हाबाहेरील व्यक्तींचा मृत्युदर मात्र तब्बल ६.४६ इतका आहे.
जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येऊ लागला आहे. गेल्या १२ दिवसांपासून दोन आकडी रुग्ण संख्या येऊ लागली आहे. मृत्यूचे प्रमाणदेखील दोन दिवसांपासून एक आकडी संख्येवर आले आहे. यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील मृत्युदर कमी होण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावणेदोन ते दोन टक्क्यांच्या दरम्यानच मृत्युदर स्थिर आहे. सद्य:स्थितीत सरासरी १.९९ टक्के इतका मृत्युदर कायम आहे.
दुसरी लाट ठरली जीवघेणी
जिल्ह्यात दुसरी लाट ही सर्वाधिक जीवघेणी ठरली. अवघ्या ५९ दिवसात तब्बल ५३१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अर्थात दिवसाला सरासरी १० ते ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या काळात अनेकजण गंभीर प्रकृतीतून बाहेर निघाले आहेत. २३ मार्च ते २० एप्रिल या काळात सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू नोंदले गेले आहेत. कोरोनाच्या वर्षभराच्या काळात अवघे २६० मृत्युसंख्या असताना दोन महिन्यांच्या काळात ती वाढून ७९१ पर्यंत पोहचली आहे. अर्थात दोन महिन्यात तब्बल ५३१ जणांचा मृत्यू झाला आहे.
मृत्युदर कायम
जिल्ह्यातील मृत्युदर हा गेल्या दोन महिन्यांपासून कायम आहे. सरासरी पावणे दोन ते दोन टक्क्याच्या दरम्यान मृत्युदर राहत आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या ही दोन आकडी येत असली तरी मृत्यू संख्यादेखील काही अपवाद वगळता दोन आकडी येत होती. मात्र दोन दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण कमी आले आहे.
नवापूर तालुक्यात सर्वाधिक दर
मृत्युदर हा नवापूर तालुक्यात सर्वाधिक आहे. तर मृत्यू संख्या नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक आहे. नवापूर तालुक्यात चार हजार ९२ जण कोरोना बाधित झाले आहेत त्यापैकी १४६ जणांचा मृत्यू झाला असून मृत्युदर हा ३.५६ टक्केपर्यंत आहे. त्या खालोखाल नंदुरबारचा दर आहे. नंदुरबार तालुक्यात १५ हजार ७८७ जण कोरोनाबाधित असून त्यापैकी ३३७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर हा २.१३ इतका आहे. धडगाव तालुक्यात ८४९ जण कोरोनाबाधित झाले असून मृत्यू होणाऱ्यांची संख्या १८ इतकी आहे. तेथील मृत्युदर हा २.१२ टक्के आहे. तळोदा तालुक्यात तीन हजार ६९४ जण कोरोनाबाधित आढळून आले तर ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. या तालुक्याचा मृत्युदर २.३ टक्के आहे. अक्कलकुवा तालुक्यात एक हजार १२१ जण कोरोनाबाधित आढळून आले असून २२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर १.९६ इतका आहे. तर शहादा तालुक्यात ११ हजार ६४२ जण कोरोनाबाधित आढळून आले असून १९३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर हा १.६५ टक्के इतका आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यात उपचार घेणारे आणि मृत्यू झालेल्या परजिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्युदर हा सर्व तालुक्यांच्या तुलनेत अधिक अर्थात तब्बल ६.४६ टक्के इतका आहे. जिल्हाबाहेरील १, १४४ जण बाधित झाले होते तर ७४ जणांचा मृत्यू झाला होता. सद्य:स्थितीत जिल्हाबाहेरील २०४ जण जिल्ह्यातील शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत.