पंचायत समिती अक्कलकुवा येथे विकासकामांसाठी सर्वपक्षीय समन्वय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST2021-07-31T04:30:56+5:302021-07-31T04:30:56+5:30

बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी, काँग्रेसचे जि. प. सदस्य प्रताप वसावे, पं. स. सदस्य आपसिंग वसावे, सरपंच ...

All party coordination meeting for development works at Panchayat Samiti Akkalkuwa | पंचायत समिती अक्कलकुवा येथे विकासकामांसाठी सर्वपक्षीय समन्वय बैठक

पंचायत समिती अक्कलकुवा येथे विकासकामांसाठी सर्वपक्षीय समन्वय बैठक

बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी, काँग्रेसचे जि. प. सदस्य प्रताप वसावे, पं. स. सदस्य आपसिंग वसावे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजू वसावे, उपाध्यक्ष जयमल पाडवी, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र वळवी, आदी उपस्थित होते. बैठकीला तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांची उपस्थिती होती. यावेळी आमश्या पाडवी म्हणाले की, अक्कलकुवा तालुक्यातील जनता वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने पंचायत समितीला यात्रेचे स्वरूप आले आहे. प्रत्येक नागरिकाच्या हातात कागदपत्रे असतात. परंतु शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना प्रशासनामार्फत सांगण्याअगोदरच झेरॉक्स सेंटर व इतर ठिकाणी विविध योजनांच्या फाॅर्मची विक्री होते. योजना नसताना लोक ग्रामसेवक, सरपंच यांच्यामार्फत फाॅर्म भरून घेतात. एखाद्या ग्रामसेवकाने लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यास लोक वरून धमकीही देतात. दुसऱ्या पंचायतीच्या ग्रामसेवकांनी फाॅर्म भरून दिला आहे, तुला काय अडचण आहे, अशी उलट विचारणा होते. सध्या जॉबकार्डसाठी गर्दी उसळत असून, जॉबकार्ड काढण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून सहा प्रकारची चेकलिस्ट दिली असून त्यामध्ये रेशन कार्ड विभक्तची मागणी केलेली आहे. परंतु गेल्या २५ वर्षांपासून विभक्त रेशनकार्ड शासनामार्फत देण्यात आलेले नाही. त्याऐवजी स्वयं घोषणापत्राचा उपयोग करण्यात यावा. प्रताप वसावे म्हणाले की, मागील वर्षी मोठ्या प्रमाणात वैयक्तिक गोठ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आली होती. प्रमाणापेक्षा जास्त गोठ्यांची कामे मंजूर केली म्हणून तत्कालीन गटविकास अधिकारी यांची चौकशी करण्यात आली होती. तसेच यावर्षीही नागरिक मोठ्या प्रमाणात वैयक्तिक वृक्षलागवड व गोठ्यांचे प्रकरण हातात घेऊन फिरताना दिसत आहेत. म्हणून सरपंच आणि ग्रामसेवक यांनी नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या मार्गदर्शनामुळे लोकांचा वेळ आणि पैसा वाचेल. पंचायत समितीत योजनांच्या लाभासाठी एक खिडकी योजना सुरू करावी, असे सांगितले.

गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर, वृक्षलागवड‌, रस्ते, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी यासाठी पंचायतीला अगणित उद्दिष्ट असून, रोजगार हमी योजनेत अधिक काम करण्याला वाव असून, नागरिकांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सरपंच संघटना अध्यक्ष, ग्रामसेवक संघटना अध्यक्ष, पंचायत समिती सभापती यांच्यामार्फत योजनेची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार, असे आश्वासन दिले. सरपंच व ग्रामसेवक गाव विकासातील महत्त्वाचा दुवा तसेच लोकसेवक असून, सामान्य जनतेला सहकार्य करून जास्तीत जास्त योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येईल, असे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र वळवी यांनी सांगितले. सरपंच विनोद वळवी व मगन वसावे यांनीही मनोगत व्यक्त केले. या बैठकीमुळे सामान्य जनतेला दिलासा मिळणार असून, नव्या दमाने भविष्यात लोकांसाठी काम करण्याचा मनोदय सरपंच व ग्रामसेवक यांनी व्यक्त केला.

Web Title: All party coordination meeting for development works at Panchayat Samiti Akkalkuwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.