‘रेमडेसिविर’बाबत सर्वपक्षीयांचा जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST2021-04-13T04:29:20+5:302021-04-13T04:29:20+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे शहरी व ग्रामीण भागातील सामान्य व गरीब जनतेला उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची ...

‘रेमडेसिविर’बाबत सर्वपक्षीयांचा जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप
नंदुरबार : जिल्ह्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे शहरी व ग्रामीण भागातील सामान्य व गरीब जनतेला उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची नितांत आवश्यकता असून ती उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पालकमंत्री के.सी. पाडवी यांच्याकडे व सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.
जिल्हा रुग्णालयात अडीच हजार रेमडेसिविर इंजेक्शनचे डोस शिल्लक असतानाही ते जिल्ह्यातील खासगी दवाखान्यात दाखल रुग्णांसाठी दिले जात नसल्याने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यास सर्वस्वी जबाबदार जिल्हाधिकारी असल्याचा आरोप खासदार डॉ.हीना गावीत व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शहरात विविध खासगी दवाखान्यात दाखल ४९८ रुग्णांना, शहादा येथे ११५ तर नवापूर येथे १०८ रुग्णांना रेमडेसिविर हे इंजेक्शन लागणार आहेत. मात्र जिल्हा रुग्णालयात साठा उपलब्ध असतानाही जिल्हाधिकारी ते रुग्णांना देत नाहीत व तसा आदेश करत नाहीत. राज्य शासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, त्या-त्या दवाखान्याची मागणी योग्य त्या नमुन्यामध्ये मागून त्यांना ती उपलब्ध करून द्यावेत, मात्र तसे होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी कालच फेसबूक लाईव्हच्या माध्यमाने सांगितले आहे की, ज्या रुग्णांचा सिटी स्कोर पंचवीसपैकी २० असेल तरच रेमडेसिविर द्यावे असे सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी रेफरन्स म्हणून इंग्लंडच्या एका जर्नलचा संदर्भ दिला आहे. मात्र आईसीएमआरच्या गाइड-लाइन्सनुसार कोविड रुग्णाची लक्षणे कमी करण्यासाठी पहिल्या १० दिवसात रेमडेसिविर दिले पाहिजे. तसेच सिटीस्कोर आठपेक्षा जास्त असेल तर रेमडिसिवर दिले पाहिजे, असेही म्हटले आहे. शहरात उपचार घेणारे सर्व रुग्ण एमडी डॉक्टरच्या देखरेखीखालीच उपचार घेत आहेत. त्याशिवाय या दवाखान्यांना मान्यता दिली जात नाही. देशात व राज्यात सर्व डॉक्टर आयसीएमआरचा प्रोटॉकल मानत आहेत. त्याप्रमाणेच उपचार करत आहेत. नाकी इंग्लंडच्या जर्नलप्रमाणे आपल्या देशात उपचार चालू आहेत, मात्र आपले जिल्हाधिकारी काहीतरी वेगळी माहिती आत्मसात करून तो प्रोटोकॉलचा अवलंब करीत आहेत. या आयसीएमआरच्या गाईडलाईनची कॉपी मी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहे.
आज तीन दिवस झाले तरी जे रुग्णालय त्यांच्याकडे दाखल रुग्णांसाठी रेमडेसिविर मागत आहेत त्यांना ते दिले जात नाही त्याबाबतचे पत्र शासनाने काढूनही त्यांचेही पालन जिल्हाधिकारी करत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणून आम्ही सर्वपक्षीयांनी पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवींकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. मात्र तरीदेखील जिल्हाधिकारी वेगळी थेअरी वापरून ते देत नसल्याने या रुग्णांना रुग्णालयात मरायला सोडून दिले आहे. जिल्ह्याचा मृत्युदर वाढत आहे मग जिल्हा रुग्णालयातील २५०० इंजेक्शन कोणासाठी ठेवले आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्य शासनाने व पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन जिल्हाधिकारी करीत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.