चारही पालिकांची वसुली ७० टक्केच्या आतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 11:59 IST2020-03-16T11:59:18+5:302020-03-16T11:59:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चारही नगरपालिका आणि एक नगरपंचायतीतर्फे विविध करांच्या वसुलींसाठी ठोस मोहिम राबविण्यात येत आहे. ...

All four municipalities recover within 5% | चारही पालिकांची वसुली ७० टक्केच्या आतच

चारही पालिकांची वसुली ७० टक्केच्या आतच

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील चारही नगरपालिका आणि एक नगरपंचायतीतर्फे विविध करांच्या वसुलींसाठी ठोस मोहिम राबविण्यात येत आहे. चारही पालिकांची एकुण वसुली सरासरी ६० ते ६५ टक्के आहे. ती वाढविण्यासाठी पालिकांनी पथके स्थापन केली असून मोठ्या थकबाकीदारांविरुद्ध विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
पालिकांच्या वसुली मोहिमेसाठी शासन स्तरावरून विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. सरासरी वसुली किमान ८० ते ८५ टक्केपर्यंत गेलीच पाहिजे यासाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे वसुलीसाठी सर्वच पालिका सरसावल्या आहेत. परंतु मार्च सुरू होऊनही वसुलीची टक्केवारी ६० ते ६५ टक्केपर्यंतच अडकली आहे. ती वाढविण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत.
मोठे थकबाकीदार
जिल्ह्यात मोठ्या थकबाकीदारांविरुद्ध त्या त्या पालिकांनी आता मोहिम सुरू केली आहे. त्यासाठी अशा थकबाकीदारांची यादीच वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जात आहे. त्यानंतरही असे थकबाकीदार रक्कम भरण्यासाठी पुढे आले नाहीत तर त्यांची यादी पुन्हा ते राहणाऱ्या मुख्य चौकातच होर्र्डींगवर लावण्याचे नियोजन काही पालिकांनी करून ठेवले आहे. त्यानंतर शेवटचा उपाय हा जप्तीचा राहणार आहे.
नळ कनेक्शन खंडीत करण्याचाही पर्याय राहणार असल्याचे सांगण्यात आले. अर्थात केवळ दोन आठवड्यात ही सर्व प्रक्रिया कशी आणि किती पुर्ण होईल याबाबत शंकाच आहे.
विविध बाबीतून सुट
पालिका नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापासूनच मालमत्ताधारकांना नोटीसा बजावण्यास सुरुवात करतात. नंदुरबार पालिकेने देखील डिसेंबर महिन्यात नागरिकांना मालमत्ता कराच्या नोटीसा बजावल्या होत्या. नोटीस मिळाल्यानंतर महिनाभराच्या आत व त्यानंतर विविध टप्पे करून विशिष्ट प्रकारच्या रक्कमेची सूट देखील देण्यात आली होती. त्यात दोन टक्केपासून तर दहा टक्केपर्यंतच्या रक्कमेची सूट होती. परंतु तरीही नागरिक ऐनवेळीच थकीत कर भरण्यासाठी पुढे येतात.
या आठवड्यात करांचा भरणा करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी गर्दी करण्यापेक्षा वेळेत कर भरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. यासाठी ध्वनीक्षेपक लावलेल्या रिक्षांद्वारे देखील आवाहन करण्यात येत आहे.
शासनातर्फेही तगादा
शासनातर्फे पालिकांना जास्तीत जास्त वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. किमान ८५ ते ९० टक्के वसुली झाली पाहिजे अशा सुचना पालिकांना देण्यात आल्या आहेत. वसुलीवरच पालिकांना मिळणारे अनुदान अवलंबून राहणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या सुचना देण्यात येत आहेत.


अनेक पालिका वसुलीबाबत मात्र दुजाभाव करीत असल्याचे चित्र दिसून येते. मोठ्या थकबाकीदारांना अभय व लहान परंतु नियमित मालमत्ताकर भरणाऱ्यांकडे तगादा असे चित्र दिसून येते. मोठे थकबाकीदार आपल्याकडील एकुण रक्कमेच्या काही टक्के रक्कम भरून वेळ निभावून नेत असतात. परंतु त्याची थकबाकी ही कायम राहत असते, काही थकबाकीदार पालिकांच्या नोटीसीला आव्हान देत थेट न्यायालयात धाव घेतात. न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यावर ते त्यांच्या पथ्यावर पडत असते.

Web Title: All four municipalities recover within 5%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.