अजितदादा, स्ट्रॉबेरीचे ‘चॉकलेट’ होऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST2021-02-14T04:29:13+5:302021-02-14T04:29:13+5:30

सातपुड्यातील तोरणमाळ व डाब हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथील वातावरणाचा अभ्यास करून कृषी विभागाने सात-आठ ...

Ajitdada, don't let strawberries become 'chocolate' | अजितदादा, स्ट्रॉबेरीचे ‘चॉकलेट’ होऊ देऊ नका

अजितदादा, स्ट्रॉबेरीचे ‘चॉकलेट’ होऊ देऊ नका

सातपुड्यातील तोरणमाळ व डाब हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथील वातावरणाचा अभ्यास करून कृषी विभागाने सात-आठ वर्षापूर्वी या भागातही स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ शकते काय? यादृष्टीने प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग राबविले होते. तेव्हा डाब आणि तोरणमाळ येथील एका शेतकऱ्याने काही गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली. स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू झाले, पण सुरुवातीला ती काढावी कशी आणि त्याची विक्री कशा पद्धतीने करावी यासंदर्भात फारशी माहिती नसल्याने पहिल्या वर्षी हौसेखातर शेतकऱ्यांनी समाधान मानून घेतले. पुढे त्यापासून प्रेरणा घेत अजून काही शेतकरी पुढे आले. गेल्या सात-आठ वर्षात आता स्ट्रॉबेरीचे क्षेत्र गुंठ्यांवरुन एकरमध्ये गेले आहे. यावर्षीदेखील सुमारे ३० शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून अनुभवातून आता उत्तम प्रतीचे उत्पादन सुरू झाले आहे. येथील स्ट्रॉबेरीची चव खरोखरच उत्कृष्ट असून महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा ती वरचढ ठरली आहे. त्यामुळे या स्ट्रॉबेरीला जिल्ह्याची नवीन ओळख देण्याच्या दृष्टीने पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी नाशिक येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीचे निमित्त साधत त्यांना भेट देण्याचे नियोजन केले. उपमुख्यमंत्र्यांनीही ही भेट मोठ्या कौतुकाने स्वीकारली आणि स्ट्रॉबेरीच्या चवीचा गोडवाही सांगितला. या भेटीच्या निमित्तानेच जिल्हा प्रशासनाने तोरणमाळ व स्ट्रॉबेरीचा विकासाचा ५० कोटीचा आराखडाही दिला. त्याला मंजुरी देण्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले. नव्हे तर प्रोत्साहन देण्यासाठी योजना तयार करण्याच्याही सूचना दिल्या. त्यामुळे यानिमित्ताने गेल्या वर्षानुवर्षापासून रखडलेले तोरणमाळ विकासाचे स्वप्न साकारता येईल, अशी आस आता जिल्हावासीयांना लागली आहे. त्याचबरोबर सातपुड्यातील डोंगराळ शेतीचा विकासाचा आराखडा तयार होऊन वर्षानुवर्षे अतिक्रमीत डोंगराळ, खडकाळ शेतीवर राबराब राबून दोनवेळच्या पोटाची खळगी भरण्याइतकेही उत्पन्न न मिळू शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्गही सुकर होईल, अशीही अपेक्षा लागून आहे. अतिक्रमित जमिनी आता शेतकऱ्यांच्या मालकीची करण्याची प्रक्रियाही सुरू झाली असून सुदैवाने राज्याचे आदिवासी विकासमंत्रीपद याच भागातील सुपुत्र ॲड.के.सी. पाडवी यांच्याकडे आहे. त्यामुळे हा योग चांगला मानला जात आहे. साहजिकच आशा-अपेक्षांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अर्थातच सातपुड्यातील जनतेच्या व परिसराच्या विकासासाठी आजवर अनेक योजनांची घोषणा झाली, आश्वासने मिळाली परंतु प्रत्यक्षात अपेक्षित विकासाचे फळ अद्यापही या भागातील जनतेला चाखायला मिळालेले नाही. आता स्ट्रॉबेरीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा नवीन आस जागृत केली आहे. त्यामुळे आता स्ट्रॉबेरी विकासाचा आराखडा ‘चॉकलेट’ दाखवल्यासारखे होऊ नये हीच अपेक्षा.

Web Title: Ajitdada, don't let strawberries become 'chocolate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.