कृषी पर्यटनाला वाव देत फुलवली शेती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:31 IST2020-01-01T12:30:45+5:302020-01-01T12:31:23+5:30
राधेश्याम कुलथे । लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनातून वेळ काढून लोक पर्यटनाकडे आकर्षित होत आहेत. ...

कृषी पर्यटनाला वाव देत फुलवली शेती...
राधेश्याम कुलथे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनातून वेळ काढून लोक पर्यटनाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कृषी पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहे. ही संधी ओळखून शहादा तालुक्यातील जवखेडा येथील कृषीभूषण शेतकरी हिरालाल ओंकार पाटील यांनी आपल्या २० एकर क्षेत्रात कृषी पर्यटन केंद्र उभारून नंदनवन फुलवले आहे. याठिकाणी असलेल्या वनस्पतींच्या माहितीसाठी हे केंद्र पर्यटकांचे आकर्षित केंद्र बनले आहे. या केंद्रात विविध प्रकारचे आयुर्वेदीक वृक्ष लागवड करून उत्पन्न घेण्यात येत आहे.
शहादा तालुक्यातील जवखेडा येथील प्रगतीशील शेतकरी कृषीभूषण हिरालाल ओंकार पाटील (७१) यांनी आपल्या शेतात इतर पिकांबरोबरच आंतर पीक म्हणून सुमारे १४ एकर क्षेत्रात पाच हजार रक्तचंदनाच्या झाडांची लागवड केली आहे. या झाडांपासून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले. शेती व्यवसाय हा तर प्रत्येक शेतकरी करतो. परंतु वेगळे काही अंतर पीक म्हणून इतर पिकांचेही उत्पन्न घेण्याचा विचार करून आपल्या शेतात हा प्रयोग हिरालाल पाटील यांनी यशस्वी केला. त्यांनी आपल्या कृषी पर्यटन केंद्रात शेताच्या बांधावर १५ वर्षीपूर्वी रक्तचंदन व सफेद चंदनच्या झाडांची लागवड केली होती. या २५ झाडांची आताची किंमत ९० ते ९५ लाख रुपये एवढी असून कर्नाटक येथे ते विक्रीला पाठवण्यात येणार आहे.
रखवालदाराची नजर
कृषी पर्यटन केंद्रात अनुसूचित प्रकार घडू नाही यासाठी श्रावण शंकर गायकवाड व त्यांची पत्नी गौरी गायकवाड हे केंद्रात रखवालदारी करून पिकांवर लक्ष ठेवतात. आयुर्वेदीक वृक्षांची व इतर पिकांसह येणाऱ्या पर्यटकांची हेळसांड यासाठी हे दाम्पत्य मेहनत घेतात.
रक्त चंदनाची रोपे कर्नाटक येथून तीन ते चार फूट उंचीचे प्रती रोप ७० रुपयेप्रमाणे मागविण्यात आले. सुमारे १५० एकराच्या बांधावर या झाडांची लागवड केली. त्यांची उंची ३० ते ४० फूट उंचीची झाली आहे. शेती पुस्तके, कृषीविषयक माहितीपर मार्गदर्शन देणाºया वृत्तपत्रांच्या माध्यमातून हिरालाल पाटील यांनी आपल्या कृषी पर्यटन केंद्राबरोबरच शेतीला जणू विविध पिकांच्या प्रयोगासाठी प्रयोगशाळा बनविली आहे.
हिरालाल पाटील यांनी नैसर्गिक शेती, देशी गायींच्या मलमूत्रापासून सेंद्रीय खताचा वापर करणे या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन घेतले. पुढे सेंद्रीय खताचा वापर करून पिके घेण्याचा मानस त्यांनी या वेळी व्यक्त केला. त्यांनी आपल्या कृषी पर्यटन केंद्रात मिलिडूबिया, टरबूज, खरबूज, वाटाणे, वाल, गिलकी, बीट, टमाटे, वांगे, कोबी या पालेभाज्यांसह रूद्राक्ष, रक्तचंदनाची लागवड केली आहे. त्यात त्यांना विक्रमी उत्पन्न मिळत आहे.
जवखेडा येथील कृषीभूषण हिरालाल पाटील यांनी कृषी पर्यटन केंद्र व शेतीच्या बांधांवर रक्तचंदनाची झाडे लावली आहे. या झाडांना पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनची व्यवस्था केली आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी आंतर पिकात ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. रक्तचंदनाच्या एका झाडाला दिवसातून आठ ते दहा लीटर पाणी देण्यात येते. त्याचबरोबर जवळच असलेल्या पिकांनाही त्या पाण्याचा निचरा होऊन फायदा होतो. कृषी पर्यटन केंद्राला भेट देणाºया शेतकऱ्यांना हिरालाल पाटील हे मार्गदर्शन करतात. त्यात पाण्याचे महत्त्व, सेंद्रीय शेतीचे प्रयोग यासह शेतीविषयक विविध बाबींची माहिती ते शेतकºयांना देतात.