नंदुरबार जिल्हावासीयांना कोरोनाचा दुपारी दिलासा, सायंकाळी धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 12:21 IST2020-05-08T12:21:03+5:302020-05-08T12:21:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुरुवारचा दिवस जिल्हावासीयांसाठी ‘कभी खुशी कभी गम’चा गेला. शहादा येथील ५२ वर्षीय महिला कोरोनामुक्त ...

नंदुरबार जिल्हावासीयांना कोरोनाचा दुपारी दिलासा, सायंकाळी धक्का
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुरुवारचा दिवस जिल्हावासीयांसाठी ‘कभी खुशी कभी गम’चा गेला. शहादा येथील ५२ वर्षीय महिला कोरोनामुक्त झाल्याचे समाधान व्यक्त होत असतांना सायंकाळी मुळची बोरद येथील व सध्या आष्टे येथे मुक्कामास असलेल्या ६८ वर्षीय वृद्धेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या नवीन रुग्णामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २० झाली आहे. त्यापैकी एकाचा यापूर्वीच मृत्यू झाला असून पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. १४ जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना कायम ठेवण्यात आल्या आहेत. नंदुरबारातील प्रतिबंधीत क्षेत्रातील चारही रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने प्रशासनाने या भागात काही बाबींना शिथीलता दिलेली आहे. दुसरीकडे शहादा येथील एक रुग्ण देखील कोरोनामुक्त झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र गुरुवारी सायंकाळी एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.
आष्टे येथे लेकीकडे...
मुळची बोरद येथील असलेली वृद्ध महिला गेल्या दोन महिन्यांपासून आष्टे येथे मुलीकडे मुक्कामाला होती. याच दरम्यान वृद्धेची प्रकृती खालावल्याने त्यांना नंदुरबारातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेतल्यानंतर महिलेची प्रकृती न सुधारल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने महिलेचे स्वॅब घेवून त्यांना आयशोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. या वृद्धेचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला.
वृद्धेची ट्रॅव्हल्स हिस्ट्री तपासली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुटूंबातील एकजण बाहेर गावाहून आल्याचे सांगितले जात आहे. त्याला पुष्टी मिळाली नाही. दरम्यान, आरोग्य विभागाने तातडीने महिलेच्या कुटूंबातील सर्व व्यक्तींना क्वॉरंटाईन केले आहे. आष्टे येथे प्रतिबंधीत क्षेत्र करून जंतूनाशक फवारणी केली जात आहे. गावात लॉकडाऊन करण्यात आले आहे.
ग्रामिण भागात धडक सुरूच
नटावद, ता.नंदुरबार येथील व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता आष्टे येथील वृद्ध महिलेला देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोरोनाने ग्रामिण भागात देखील धडक मारल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ग्रामिण भागातही दक्षता बाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
शहादावासीयांना दिलासा
शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील बागवान गल्लीतील पहिली कोरोना विषाणू बाधित महिला आज कोरोना वर मात करून सुखरूप शहरात परतली या वेळी अधिकार्यां तर्फे तिचे फूलांचा वर्षाव करीत टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले
आज दुपारी कोरोना विषाणू संकटावर मात करीत ५२ वर्षीय महिलेने विजय मिळविला आहे तब्बल १८ दिवस जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने तिच्यावर उपचार केले त्यामुळे तिची या जीवघेण्या आजारातून सुटका झाली आहे. जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर या महिलेला रुग्णवाहिकेत द्वारे शहाद्यात आणण्यात आले. तेथे प्रांत अधिकारी डॉ.चेतन गिरासे, तालुका वैद्यकिय अधिकारी डा.ॅ राजेंद्र पेंढारकर, औषध निमार्ता रविभाई पाटील, न.पा.अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या महिलेचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
शहाद्यातील ९ रुग्ण सापडल्यानंतर शहरात सर्वत्र उपाययोजना करण्यात आल्या. परंतु गेल्या १० ते १२ दिवसात शहाद्यात एकही नवीन रुग्ण सापडला नाही. जे रुग्ण सापडले होते त्यांच्या संपर्कातील सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याशिवाय प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. वेळोवेळी परिसरात सॅनिटाईज करण्यात आले आहे.
शहाद्यातील उपचार घेणारे कोरोनाग्रस्त ८ रुग्णांपैकी एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. उर्वरित ७ रुग्णांवर आता उपचार सुरू आहेत. हे सातही देखील पुर्णपणे बरे होण्याच्या मार्गावर आहेत. या रुग्णांचे सलग दोन अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांनाही कोरोनामुक्त घोषीत करून त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे. यामुळे नंदुरबारप्रमाणे आता शहाद्याबाबतही आशा लागून आहेत.
अक्कलकुवाही स्थिर
अक्कलकुव्यात देखील नवीन रुग्ण सापडलेला नाही. पहिला रुग्ण सापडलेल्या महिलेचे दुसरे व तिसरे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यांच्या संपर्कातील उर्वरित तीन जणांची प्रकृती देखील झपाट्याने सुधारत आहे. त्यामुळे १४ दिवसांच्या त्यांच्यावरील उपचाराच्या कालावधीनंतर त्यांचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. अक्कलकुव्यात देखील आवश्यक त्या उपाययोजना कायम आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये बाजारातील वेळेचे नियोजन करण्यात येत आहे.