किशोरवयीन वागताहेत प्रौढांसारखे
By Admin | Updated: June 9, 2014 14:02 IST2014-06-09T14:02:17+5:302014-06-09T14:02:43+5:30
किशोरवयीन मुले एकदम प्रौढ असल्यासारखी वागू लागली आहेत. शाळांमधून या आशयाच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लैंगिक शोषणाची प्रकरणे समोर येतात.

किशोरवयीन वागताहेत प्रौढांसारखे
>सुधाकर जाधव■ जळगाव
किशोरवयीन मुले एकदम प्रौढ असल्यासारखी वागू लागली आहेत. शाळांमधून या आशयाच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लैंगिक शोषणाची प्रकरणे समोर येतात. ते आपल्या मनातील प्रश्न, समस्या तशाच मनात दडपून टाकतात. चुकीच्या मार्गाने शंकांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. मनात चुकीचे समज घर करून बसले की, आयुष्यभर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. बर्याच वेळा अयोग्य व भावनिक निर्णय घेतले जातात. त्यामुळे ही मुले अशी का वागतात? असा प्रश्न पालक, शिक्षक आणि समाजाला पडतो. या मुलांच्या शंकांचे निरसन वेळीच शास्त्रीय पद्धतीने झाले पाहिजे, असे राष्ट्रीय किशोर बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या मैत्री क्लिनिकच्या समन्वयिका व समुपदेशक पौर्णिमा पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात मैत्री क्लिनिकमध्ये अशा समस्यांनी ग्रस्त मुले-मुली येत असतात. बर्याचवेळेस शिक्षक, पालक मुलांच्या विक्षिप्त वागण्याबद्दल तक्रार करीत असतात. परंतु त्यामध्ये मुलांची चूक नसते. वयात येताना त्यांच्यात शारीरिक बदल होत असतो. या बदलाला सामोरे जाताना त्यांना अनेक प्रश्न सतावत असतात. त्यांना या प्रश्नांबाबत योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास ते स्वत: प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण होतात.
या पार्श्वभूमीवर त्यांना शास्त्रीय उत्तरे देण्याची आवश्यकता आहे.
१) नवमाध्यमांचा अनिष्ट परिणाम होत आहे. किशोरवयीन मुलांच्या हातात अँन्ड्रॉईड मोबाइल आले आहेत. इंटरनेटचा ते वापर करतात. टी.व्ही. प्रसार माध्यमांमधून या वयात त्यांनी जे बघायला नको ते बघतात. पर्यायाने त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करतात. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात.
२) प्रेमाचा साक्षात्कार, भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल वयाच्या १५ ते १७ वर्षापासून आकर्षण निर्माण होऊ शकते. त्यालाच प्रेम असे म्हणतात. कथा ,कादंबर्या आणि सिनेमा यामुळे ही कल्पना वाढीस लागते. ते आकर्षण दोन प्रकारचे असते. एक शारीरिक ज्यामध्ये स्वरूप, पोशाख, सौंदर्य यांना फार महत्त्व दिलेले असते. दुसरे मानसिक असते.त्यामध्ये विचार, सवयी, सामाजिक दृष्टिकोन यांना महत्त्व दिलेले असते. परंतु हे आकर्षण निर्माण होण्याचे वयही अलीकडे कमी झाले आहे. खर्या अर्थाने घडण्याच्या वयात मुले अशा प्रेमाच्या संकल्पनेत गुरफटतात. अशी काही मुले-मुली समुपदेशनासाठी येत असतात.
कशी केली जाते समस्येची सोडवणूक?
■ किशोरवयीन मुलांच्या प्रश्नांची वेळीच सोडवणूक करणे आवश्यक आहे. मुलांच्या या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मैत्री क्लिनिकच्या वतीने आश्रमशाळा, झोपडपट्टी भाग, शाळांमध्ये समुपदेशन वर्गाचे आयोजन केले जाते. या समस्या असलेल्या मुलांना घेऊन काही पालक व शिक्षकही क्लिनिकमध्ये येतात. मुले त्यांच्या परिचयाच्या व्यक्तींसमोर माहिती देण्यास कचरतात. अशावेळी एकट्याला किंवा एकटीला समस्यांविषयी विचारणा केली जाते.
■ बर्याच वेळेस किशोरवयीन मुले त्यांच्या समस्या, प्रश्न चिठ्ठीवर लिहून देतात. सर्वसाधारणपणे त्यांचे सर्व प्रश्न अवयवात होणारा बदल, लैंगिक, मानसिक अशा स्वरूपाचे असतात. मूळ समस्या कळल्यानंतर समुपदेशन केले जाते.
■ अवयवात होणारा बदल, भावना या विषयीची माहिती चित्रांच्या साहाय्याने सांगितली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लैंगिक शिक्षणच दिले जाते. कुछ कुछ होता है, ही माहितीपूर्ण सी.डी., पुस्तिका याद्वारे माहिती दिली जाते. यामुळे अनर्थकारी चुका टाळता येतात.
जिल्हाभर सुरू होणार मैत्री क्लिनिक
राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमअंतर्गत सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मैत्री क्लिनिक आहे. त्याचप्रमाणे चोपडा, मुक्ताईनगर आणि जामनेर येथेही साप्ताहिक क्लिनिक आहे. २0१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात १५ नवीन मैत्री क्लिनिक सुरू होणार असल्याची माहिती पौर्णिमा पाटील यांनी दिली.