नवापुरात पुन्हा ४७ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:29 IST2020-06-23T11:28:27+5:302020-06-23T11:29:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : जिल्ह्यात वाळू वाहतुकीची बंदी असताना नवापूर तालुक्यातून वाळू वाहतूक करीत असतांना सोमवारी पुन्हा $&४७ ...

नवापुरात पुन्हा ४७ वाहनांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : जिल्ह्यात वाळू वाहतुकीची बंदी असताना नवापूर तालुक्यातून वाळू वाहतूक करीत असतांना सोमवारी पुन्हा $&४७ डंपर व ट्रक पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत. महसुल व पोलीस विभागाने केलेल्या तीन कारवायांमधे आतापर्यंत ८५ ट्रक पकडल्या आहेत.
कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी वाहतुकीची जिल्हाबंदीमुळे होत असलेल्या या कारवायांमधे हस्तगत ट्रक रहिवाशी भागात उभे केल्या जात असुन त्यांचे बरेचशे चालक व सहचालक हॉटस्पॉट भागातील असल्याने कोरोनाची भिती शहरात उगम पावत आहे. विरोधाभास असलेल्या या स्थितीवर उपाययोजना करावी अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी वाळुची वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्हांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. दुसरीकडे गुजरात हद्दीत तापी नदीपात्रातुन निझर येथे वाळुचा उपसा सुरु आहे. वजनावर व ब्रासवर मोजुन त्यापोटी गौणखनिज करासह वाळुची रक्कम अदा करुन ही वाळु निझर येथून औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे, चाळीसगाव व इतर ठिकाणी वाहुन नेली जात आहे. निझर ते नंदुरबार अंतर कमी असतांनाही गुजरात हद्दीतील ६५ किलोमिटर अंतर कापुन नवापुर गाठल्यानंतर महामार्गावरुन वाळुची वाहतुक होत असल्याने अश्या वाहनांवर पोलीस प्रशासनाकडुन कारवाई केली जात आहे.
नवापूर हद्दीत पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज महाजन, दिगंबर शिंपी, नासिर पठाण व पोलिस कर्मचारी आठवड्यापासून वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रका पकडण्याचे काम करीत आहेत. आतापावेतो तीन वेळा झालेल्या कारवाइतुन ८५ वाहने पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत. न्यायालयाने अश्या २६ वाहनांवर प्रत्येकी दोन हजार दोनशे रुपये दंड आकारले असुन ८५ पैकी २६ वाहनांचा दंड वसुल झाल्याने ही वाहने मार्गस्थ झाली आहेत. तहसिल कार्यालय, पोलीस स्थानक, पंचायत समिती, भुमी अभिलेख, कोषागार कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना व सहनिबंधक कार्यालय हे जवळ जवळ असुन या सर्व विभागांच्या कार्यालय परिसरात आज ५९ वाहने उभी होती.
शनिवार पासुन त्यातील काही वाहने उभी आहेत. या वाहनांचे चालक व सहचालक तीन दिवसांपासुन उभ्या वाहनांवर प्रतिक्षा करीत आहेत. वेळ घालविण्याचे साधन नसल्याने सोशियल डिस्टंसिंगचे पालन त्यांच्याकडुन होत नसल्याचे व मास्क तथा सॅनिटायझेशन विना त्यांचा या परिसरात वावर होत आहे. त्यापैकी बरेच जण हॉटस्पॉट भागातील असल्याने ट्रक उभ्या केलेल्या रहिवास भागातील नागरीकांसह त्या शासकिय कार्यालयांमधे येणारे नागरिक भयभीत होत आहेत. काहींनी या प्रकारावर तिव्र नापसंती व्यक्त केली आहे.
२६ ट्रकांवर न्यायालयाने दंडात्मक कारवाई केल्याने त्या मार्गस्थ झाल्या असुन उर्वरित ५९ ट्रकावरही अशीच कारवाई अपेक्षीत असल्याने तोवर ही वाहने पोलीस व महसूल विभागाच्या आवारात उभ्या राहणार आहेत.
कोरोनाचा संसर्ग होउ नये यासाठी खटाटोप केला जात असतांना रहिवास भागात वाहने उभी करुन त्याच कोरोनाचे संसर्ग होण्याची शक्यता वाढत असल्याचा नागरिकांचा रोष आहे. प्रशासनाने जरुर कारवाई करावी मात्र एवढ्या मोठ्या संख्येने जर वाहने जमा करण्याची वेळ येत असेल तर शहरहद्दीत रहिवास क्षेत्र टाळुन ही वाहने उभी करुन तेथे तात्पुरता बंदोबस्त उभारणे शक्य असल्याची सुचना नागरीकांमधुन केली जात आहे. यासोबतच सर्व ट्रक चालक तथा सहचालकांना सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी तात्पुरती व्यवस्था प्रशासनाने करुन त्यांना सेनिटाईझर व मास्क देण्याची गरज देखील व्यक्त होत आहे. खुप परिश्रम घेउन प्रशासनाने व मोठ्या हालअपेष्ठा सोसुन नागरीकांनी शहर व तालुक्यात कोरोनावर मात केली आहे. वाळु वाहतुकीमुळे या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले जाण्याची भिती व्यक्त होत आहे.
आराळे येथे वाळूचा ट्रक पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात वाळू उपसा बंद असतानाही आराळे, ता.नंदुरबार शिवारातून वाळू भरून ट्रक जाताना आढळून आला. गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थांनी पाठलाग करून ट्रक पकडला.
जिल्ह्यात वाळू उपसाला परवाणगी नाही. गुजरातमधील वाळू वाहतुकीवरही बंदी आहे. असे असताना अनेक ठिकाणी अशी वाहने आढळून येत आहे. तापी काठावरील आराळे येथे देखील एका ट्रकमध्ये वाळू घेवून जाताना आढळून आले. ही बाब पोलीस पाटील यांना समजताच त्यांनी लागलीच ग्रामस्थांच्या मदतीने ट्रक जप्त केला. प्रशासनाला याबाबत माहिती दिली. दरम्यान, वाळूचा ट्रक कोणाचा, कुठून वाळू भरून जात होती याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे.