प्रकाशा ते वैजाली चौफुली रस्त्यावर अपघात वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:16 IST2020-03-05T12:16:11+5:302020-03-05T12:16:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा येथील बसस्थानक चौफुली ते वैजाली चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर गतिरोधक सूचनाफलक नसल्याने वाहनधारकांना चौफुलीची ...

प्रकाशा ते वैजाली चौफुली रस्त्यावर अपघात वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : प्रकाशा येथील बसस्थानक चौफुली ते वैजाली चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर गतिरोधक सूचनाफलक नसल्याने वाहनधारकांना चौफुलीची कल्पना येत नाही त्यामुळे या चौफुलींवर अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. या चौफुलींवर संबंधित ठेकेदारांने गांभीर्याने लक्ष देवून गतिरोधक टाकण्याची मागणी होत आहे. अन्यथा या विरोधात रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
कोळदा ते सेंधवा या रस्त्याचे काम सुरू असून, प्रकाशा येथील बसस्थानक चौफुली व वैजाली चौफुली जवळ जवळ असल्याने याठिकाणी कोणतेही सूचना फलक लावण्यात आले नसल्याने प्रकाशेकरांचा जीव धोक्यात आला असल्याचे चित्र आहे.
दरम्यान ३० फेब्रुवारी रोजी वैजाली चौफुलीवर एका जीपने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिल्याने गावातील काशिनाथ शंकर चौधरी यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघात जीपदेखील रस्त्याच्या कडेला पलटी झाली होती. त्यामुळे यातील प्रवासीही जखमी झाले होते. ३ मार्च रोजीही याच चौफुलीवर एका अवजड वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जमखी झाले होते. २७ फेब्रुवारी रोजी एक ट्रक सायंकाळी रास्ताच्या कडेला उतरला होता. या वेळी थोडक्यातच हॉटेल बचावली.
डांबरखेडा येथेही रस्ता काम सुरू असून, या ठिकाणीही अशीच परिस्थिती असल्याने आत्तापर्यंत चार जणांना जीव गमवावा लागला आहे. या मार्गावर गतिरोधकाअभावी अपघात मालिकेचे सत्र सुरू झाले असून, संबंधित ठेकेदाराने या दोन्ही चौफुलीवर गतिरोधक बसून, सूचना फलक लावण्याची मागणी होत आहे.
दरम्यान संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसेंदिवस अशाच घटना घडत राहिल्या तर संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे विकासोचे अध्यक्ष हरी पाटील यांनी सांगितले.
पूर्वी प्रकाशा गाव एकाच बाजूला वसले होते. मात्र आता रस्त्याचा पलीकडे ही गाव व शाळा असून, ग्रामस्थांच्या शेतीसाठी रस्त्या पलिकडील वसाहतीत जाण्यासाठी रस्ता ओलांडून जावे लागत असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालीत मार्गक्रमन करावे लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी नागरिकांच्या जीवाशी खेळू नये असेही बोलले जात आहे. येत्या दोन दिवसात या मार्गावर आवश्यक त्याठिकाणी गतिरोधकाचे काम झाले नाही तर येत्या काही दिवसात रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांतर्फे देण्यात आला आहे.