मजूर परतू लागल्याने रोहयोच्या कामांना गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:04 PM2020-02-16T13:04:06+5:302020-02-16T13:04:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना गती द्यावी. सेल्फवरील कामांची संख्या वाढविण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना गती द्यावी. सेल्फवरील कामांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एन. पाटील,उपवनसंरक्षक सुरेश केवटे उपस्थित होते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत केंद्र शासन प्रती कुटुंब १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देते. त्यानुसार प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे मनेरगा योजनेची प्रसिद्धी गावपातळीवर करावी. प्रत्येक गावामध्ये सेल्फवर मंजुर असलेली कामाची यादी गाव चावडीच्या नोटीस बोर्डावर लावुन गावकऱ्यांना आवाहन करावे, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबधीत यंत्रणेला दिल्या.
बैठकीत त्यांनी रोजगार हमी योजनावर सद्य स्थितीत सुरु असलेली कामे व अपुर्ण कामांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायती मार्फत गाळ काढणे, विहिर पुर्नभरणाचे काम करण्याच्या सूचनाही डॉ.भारुड यांनी दिल्या. रोहयो अंतर्गत कामे सुरु असलेल्या कामाच्या जिओ टॅगींगबाबत त्यांनी माहिती घेतली. शेतरस्ते आणि पाणंद रस्ते योजना आणि खाजगी क्षेत्रावर वृक्ष लागवड योजनेवर अधिक भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा,तळोदा येथे मनरेगा मधुन अनेक प्रकारचे कामे करता येतील. त्यामुळे जिल्ह्यातील मजुराचे स्थंलातर रोखता येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.