ग्रामीण भागात पावसाळापूर्व कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST2021-05-25T04:34:05+5:302021-05-25T04:34:05+5:30
पावसाळा अगदी तोडांवर येऊन ठेपल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी आपापल्या राहत्या घरी गुरांसाठी लागणारा चारा साठवण्याचा वाडा, गुरांचे ...

ग्रामीण भागात पावसाळापूर्व कामाला वेग
पावसाळा अगदी तोडांवर येऊन ठेपल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी आपापल्या राहत्या घरी गुरांसाठी लागणारा चारा साठवण्याचा वाडा, गुरांचे गोठे, व शेतीमाल साठवण करण्याची मोठी गोदामे तसेच मातीच्या घरांचे छत, धाबे दुरुस्त करण्याच्या कामाला वेग दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद आहेत. त्यात काही वेळ सूट मिळत असून, बाजारपेठ सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वस्तू उपलब्ध होत असल्यामुळे कामाला गती आली आहे.
तालुक्यातील डोंगरगाव, सावखेडा, शेल्टी आदी शिवारातून पूर्वी बैल गाडीवरून मोठ्या कष्टाने खारी माती आणली जायची. मात्र आता ट्रॅक्टरने महाग खारी माती आणून धाब्यांवर टाकली जाते. सध्या खारी मातीसाठी मोठी किंमत मोजावी लागते. पूर्वी पावसाळ्याच्या दीड ते दोन महिना आधीपासून खारी माती लांबून आणून अंगणात टाकली जायची. त्यानंतर मित्र मंडळीतील ८ ते १० व्यक्तींना बोलवून त्यांच्या मदतीने प्रेमाच्या भावनेपोटी खारी माती धाब्यांवर मोफत चढवून पसरविली जायची. त्यानिमित्ताने मित्र मंडळी एकत्र येत छोटेखानी चहा, नास्त्याचा कार्यक्रमदेखील होत असे. मात्र हे चित्र आता ग्रामीण भागात बदललेले दिसून येते. याच कामासाठी आता पैसे मोजावे लागत असल्याचे चित्र आहे.
खारी माती महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यावर उपाय म्हणून प्लॅस्टिक कागद पूर्ण धाब्यांवर अंथरण्यात येत आहे. त्यासाठी धाबे कोरून कागद अंथरल्यावर माती टाकली जाते. या कामासाठी मजुरी द्यावी लागते.
तालुक्यातील शोभानगर, वडछील पुनर्वसन, राणीपूर, पिंप्राणी आदी आदिवासी पट्ट्यातील गावांमध्ये पावसाळ्यात घर गळू नये म्हणून कौलांच्या दुरुस्तीची कामे असून, घरांची बांधणी करण्यात येत आहे. कुटुंबासह आदिवासी बांधव घरांची बांधणी करतानाचे चित्र दिसून येत आहे. तसेच पावसाळ्यात सरपणाची कमतरता भासू नये म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने शेतातील कापसाच्या काड्या घराभोवती साठवण्यात येत आहेत. तसेच गुरांसाठी लागणारा सुका चाऱ्याची साठवणूक सुरू आहे. पावसाळ्यात शेतात असलेला गुरांसाठीचा चारा ओला होऊ नये म्हणून शेतकऱ्यांकडून शेडमध्ये चाऱ्याची साठवणूक करण्यात येत आहे.