२० दिवसात ८९ ग्रामपंचायती झाल्या कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST2021-05-13T04:31:16+5:302021-05-13T04:31:16+5:30

नंदुरबार : अवघ्या २० दिवसात जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतींनी कोरोनाला हद्दपार केले आहे. सद्या २७९ ग्रामपंचायतीत कोरोना रुग्ण असून ...

89 gram panchayats became corona free in 20 days | २० दिवसात ८९ ग्रामपंचायती झाल्या कोरोनामुक्त

२० दिवसात ८९ ग्रामपंचायती झाल्या कोरोनामुक्त

नंदुरबार : अवघ्या २० दिवसात जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतींनी कोरोनाला हद्दपार केले आहे. सद्या २७९ ग्रामपंचायतीत कोरोना रुग्ण असून त्यांची संख्या अवघी ७३५ इतकी आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे. दरम्यान, येत्या पंधरवड्यात सर्वच ग्रामपंचायती कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

गेल्या महिन्यात अर्थात मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते एप्रिल अखेर पर्यंत जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले होते. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील कोरोना मोठ्या प्रमाणावर फैलावला होता. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजनांना गती देण्यात आली होती. प्रशासनाच्या सहकार्याने ग्रामस्थांनी देखील पुढाकार घेत या मोहिमेत सक्रिय योगदान दिल्याने ग्रामपंचायतींची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. ती एक आशादायक बाब मानली जात आहे.

गावोगावी स्वॅब तपासणी

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यात गावोगावी स्वॅब तपासणी करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केेले होते. ज्या गावात पाचपेक्षा अधिक बाधित रुग़्ण आढळले त्या गावात मोबाईल टीम जाऊन रॅपीड ॲटींजन कोरोना चाचणी करून घेत होते. त्यामुळे बाधित आढळताच त्याला विलगीकरण कक्षात व जास्त लक्षणे आढळल्यास त्याला थेट जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. त्यामुळे कोरोना फैलावापासून गावे वाचविण्यात यश आले होते.

विलगीकरण कक्ष

दहापेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या सर्वच गावांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी जिल्हा परिषद शाळा किंवा ग्रामपंचयातीचा हॅाल उपलब्ध करून देण्यात आला होता. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व तेथील शिक्षक यांची त्यासाठी ड्यूटी लावण्यात आली होती. कमी लक्षणे असलेल्या कोरोना बाधितांना अशा कक्षात ठेवण्यात येत होते. त्याचा परिणाम देखील गावात कोरोना संक्रमण न वाढण्यात झाला. मध्यम लक्षणे असलेल्यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात येत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सोय होऊन ग्रामीण भागातील कोरोनाला अटकाव करण्यात प्रशासनाला यश आले.

सर्वाधिक नंदुरबार तालुक्यात

सर्वाधिक बाधित ग्रामपंचायती या नंदुरबार तालुक्यात होत्या. तालुक्यताील ११२ ग्रामपंचायतींमध्ये कोरोना रुग्ण होते. त्यातील ३२ ग्रामपंचायती २० दिवसात कोरोनामुक्त करण्यात यश आले. तर सर्वात कमी १५ ग्रामपंचायती या धडगाव तालुक्यात होत्या. त्यापैकी २० दिवसात पाच ग्रामपंचायती कोरोनामुक्त करण्यात आल्या असून दहा ग्रामपंचायतींमध्ये अवघे २७ रुग्ण आहेत. शहादा तालुक्यात ८५ पैकी १८, नवापूर तालुक्यात ८५ पैकी २१, तळोदा तालुक्यात ४३ पैकी सात तर अक्कलकुवा तालुक्यात २८ पैकी सहा ग्रामपंचायती कोरोनामुक्त करण्यात यश आले. ­

२० दिवसात कोरोनामुक्त झालेल्या ग्रामपंचायती

२० दिवसात कोरोनामुक्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये कंकाळा, कोवलीविहीर, खापर, देवमोगरा, नवनागरमुठा, रायसिंगपूर, कळमसर मोहिदा, कोठार, तलावडी-काझीपूर, मालदा, रोझवा पुनर्वसन, विहिरमाळ, सोमावलखुर्द, जमाना, निगडी, मानखेडी, सिरसानी, हरणखुरी, अंबापूर, आमसरपाडा, उमर्दे, काळंबा, कोंडाई, खोलविहिर, खामगाव, खोलगाव, घोगलपाडा, घोटाणे, चिखलपाडा, चौपाळे, नटावद, नांदर्खे, न्याहली, पाणीबारा, पिंप्रीपाडा, बामडोद, बिज्यादेवी, गुजरभवाली, भालेर, मालवन, मौलीपाडा, रजाळे, राकसवाडा, राजापूर, वडसत्रा, वरसळी, वाघोदे, शितलपाडा, समशेरपूर, हाटमोहिदा, अंठीपाडा, कालीबारा, चरणमाळ, जामनपाडा, तारापूर, तारापूर-दुगली, तीनटेंभा, धरणपूर, नवी सावरट, नागझरी, नावली, बर्डीपाडा, बोमडूपाडा, भसरावळ, भुसारगा, नावली, वडदा, वाकीपाडा, वाडी, वासदा, शिर्वे, कवळीथ, कानडीतर्फे बोरद, खरगाव, खेडदिगर, गोडलेपाडा, मलफा टेंभली, पिपरी, तिखोरा, नवलपूर, पाडळदा, बुपकरी, ब्राम्हणपुरी, मातकुट-बोराळे, राणीपूर, लिंबार्डी, वाघर्डे, शेल्टी, सुलवाडा आदी गावांचा समावेश आहे.

Web Title: 89 gram panchayats became corona free in 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.