तांत्रिक कारणांनी रस्त्यावर बंद पडणा-या ६२ बसेसने सोडली साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST2021-02-13T04:30:52+5:302021-02-13T04:30:52+5:30
नंदुरबार जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे चार आगार आहेत. या आगारातून दिवसभरात दीड हजारापेक्षा अधिक फेऱ्या करुन प्रवाशांची ...

तांत्रिक कारणांनी रस्त्यावर बंद पडणा-या ६२ बसेसने सोडली साथ
नंदुरबार जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे चार आगार आहेत. या आगारातून दिवसभरात दीड हजारापेक्षा अधिक फेऱ्या करुन प्रवाशांची वाहतूक केली जाते. गुजरात राज्यातील सीमेवर असल्याने राज्यांबाहेर वाहतुकीतही नंदुरबारचा मोठा वाटा आहे. चारही आगारातून दर दिवशी होणाऱ्या प्रवासी वाहतूकीतून साधारण ३५ लाख रूपयांची रक्कम गोळा करण्यात येते. यासाठी एसटीच्या चारही आगारांनी बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. १० वर्षे अविरत चालणा-या बसेस ह्या कालानुरुप तांत्रिक अडचणीत येण्याचे प्रमाण वाढते. यंत्रशाळेत त्यांची दुरुस्ती होत असली तरी लांब पल्ल्याचा प्रवास करु शकत नसल्याने या बसेस ग्रामीण रस्त्यांवर चालवून प्रवाशांची सोय होते. परंतू खराब रस्ते आणि खाचखळगे यामुळे या बसेस शेवटी बिघाडांना सामो-या जातातच, अशा बसेसला धुळे विभागाच्या अवधान येथील स्क्रॅप यार्डात जमा करुन त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यातून दरवर्षी किमान १० ते १२ बसेसची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरटीओ नियमानुसार ही कार्यवाही होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
रस्त्यातच बंद पडणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांसह चालक-वाहकांना त्रास
रस्त्यात एसटी बंद पडण्याच्या कारणांमुळे ब-याचशा बसेस ह्या आगारातच लावण्यात आल्या होत्या. या बसेसचे तांत्रिक मूल्यामापन करुन त्यांना रस्त्यावर न धावू देता आगारात थांबवले जाते. रात्री-अपरात्री रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेसमुळे प्रवासी आणि चालक-वाहक यांचे हाल होत असल्याने या बसेस थांबवण्यात आल्या.
दहा लाख किलोमीटरची मुदत पूर्ण
नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा आणि नवापूर या चार आगारातून धुळे विभागाकडे देण्यात आलेल्या सर्वच बसेस ह्या १० लाख किलोमीटर अंतर पार करुन गेल्या आहेत. १० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. आरटीओ नियमानुसार बसची स्थिती चांगली असल्यास तिला प्रवासासाठी पाठवले जावू शकते. तांत्रिक बांबींचा आढावा घेत या बसेसबाबत धुळे विभागीय कार्यालयाकडून निर्णय घेण्यात येऊन आगारांना सूचना करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
मेंटेनंन्स वाढल्यास बसची विल्हेवाट
बसेसचा मेंटनन्स अर्थात देखभाल खर्च वाढल्यास बसेसची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात येतो. नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारांकडे सध्या एकूण ३२५ बसेस आहेत. या सर्व बसेसची स्थिती ही चांगली आहे. एका बसचा देखभाल दुरुस्तीचा खर्च हा वर्षाला १० लाखांच्या घरात जातो. यातून जुन्या आणि भंगार बसेसच्या फेऱ्या करणे परवडत नसल्याने त्यांना स्क्रॅपमध्ये देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील चारही आगारांमध्ये सर्वाधिक बसेस ह्या नंदुरबार तर त्याखालोखाल शहादा आगाराकडे आहेत. अक्कलकुवा आगाराच्या निम्म्या बसेस ह्या दुर्गम भागात चालतात.