नंदुरबार आगाराला ६० लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST2021-04-07T04:31:15+5:302021-04-07T04:31:15+5:30
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बसेस बंद असल्याने गेल्या सहा दिवसात राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराला ...

नंदुरबार आगाराला ६० लाखांचा फटका
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बसेस बंद असल्याने गेल्या सहा दिवसात राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराला तब्बल ६० लाख रुपयांचा फटका बसला आहे. ५२२ पैकी ५०० फेऱ्या बंद असल्याने आगाराला या नुकसानीची झळ सोसावी लागत आहे.
नंदुरबार शहरासह जिल्हाभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आता कोणत्याही भागात नजर फिरवली तर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात १ ते १५ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या काळात सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. दुपारी एकनंतर संपूर्णपणे बंद पाळण्यात येत आहे.
या दरम्यान नंदुरबार आगाराच्या बसेसदेखील बंद ठेवण्याचा निर्णय आगाराने वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेतला आहे. त्याची १ एप्रिलपासून अंमलबजावणीही करण्यात येत आहे.
नंदुरबार आगाराच्या दिवसभरात एकूण ५२२ फेऱ्या होतात. आगार बंद असल्याने यातील ५०० फेऱ्या पूर्णपणे बंद आहेत. केवळ २२ फेऱ्या सुरू आहेत. यात जिल्हाअंतर्गत बसेस कार्यान्वित आहेत. यात तळोदा, अक्कलकुवा, शहादा, नवापूर, धडगाव याच बसेस सुरू आहेत. बंद असलेल्या ५०० फेऱ्यांमुळे नंदुरबार आगाराला प्रति दिनी साधारण १० लाख रुपयांचा फटका बसत आहे. याचा विचार केला तर १ ते ६ एप्रिल दरम्यान नंदुरबार आगाराचे सहा दिवसात तब्बल ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.