तळोदा तालुक्यातील ३५ अंगणवाड्या नळ कनेक्शन विना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST2021-03-18T04:30:29+5:302021-03-18T04:30:29+5:30
तळोदा : तालुक्यातील ३५ लहान बालकांच्या अंगणवाड्या विना नळ कनेक्शन अभावी असल्याची माहिती आढावा बैठकीतून समोर आली आहे. सध्या ...

तळोदा तालुक्यातील ३५ अंगणवाड्या नळ कनेक्शन विना
तळोदा : तालुक्यातील ३५ लहान बालकांच्या अंगणवाड्या विना नळ कनेक्शन अभावी असल्याची माहिती आढावा बैठकीतून समोर आली आहे. सध्या कोरोना महामारीमुळे अंगणवाड्या बंद असल्या तरी यापूर्वी तेथील बालकांसाठी मदतनीस लांबच्या हातपंपावरून पाणी आणत असे. यातील २० अंगणवाड्या अतिदुर्गम भागातील आहेत. शासनाच्या जल जीवन मिशन अभियानात तरी त्यांच्या नळ कनेक्शनचा प्रश्न मार्गी लावावा, अशी पालकांची मागणी आहे.
तीन ते सहा वयोगटातील बालकांना सकस आहार पुरविण्यासाठी तळोदा तालुक्यात साधारण २३८ अंगणवाड्या शासनाच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पामार्फत चालवल्या जात आहेत. त्यातील ३५ अंगणवाड्यांना आजही पिण्याच्या पाण्याो नळ कनेक्शन नाहीत. त्यामुळे या बालकांसाठी संबंधित अंगणवाड्यांमधील मदतनीस जवळच्या हात पंपावर जाऊन पाणी आणत असतात. न्यूबन मधील दोन, नर्मदा नगरमधील सहा, रतनपडा येथील दोन, अंमलपडा येथील दोन, सोजरबार, अलवान, ओडीबारी, वेरीमाळ, सेंदवाई पाडा, मोकासमाल, चिनिपडा, गायमुखी, केलीपणी, थेवापणी, अक्राणी, खाकरबरी, बेडवाई, टाकळी, घोडमार, रावलापाणी, हातबारी, सिलींगपूर, कुयरी दाबर, पाल्हाबारी या अंगणवाड्याचा समावेश आहे. यातील २० अंगणवाड्या या सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात आहेत. त्यामुळे तेथे पिण्याच्या पाण्याचा नेहमीच प्रश्न असतो. कारण तेथील रहिवाशी लांबावर असलेल्या झऱ्यातील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात. साहजिकच तेथे उपाय योजना करण्यासाठी प्रशासनापुढे आव्हान असते. असे असले तरी केंद्र शासनाने जल जीवन मिशन गेल्या वर्षापासून सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत हर घर नळ कनेक्शन देण्याचे शासनाचे नियोजन आहे. सदर अभियाना अंतर्गत संबंधित अंगणवाड्यांना नळ कनेक्शन योजना राबविण्याची पालकांची मागणी आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सद्या कोरोना महामारीमुळे अंगणवाड्या शासनाने बंद केल्या असल्या तरी पुढील शैक्षणिक वर्षापासून त्या नियमित उघडतील. त्यामुळे या कालावधीत तरी ग्रामपंचायतीने त्यांना कनेक्शन उपलब्ध करून देण्याची पालकांची अपेक्षा आहे.
बहुतेक ठिकाणी बालके जवळच्या हात पंपावर अंगणवाडीतून आहार खाल्यानंतर नजीकच्या हात पंपावर पाणी पीत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जिल्हा परिषदेने निरागस बालकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आहे.
नर्मदा नगर सारख्या मोठ्या ग्राम पंचायतीत कनेक्षणाच्या अभाव
तळोदा तालुक्यातील बोरद, अमोणी व नर्मदा नगर या तीन ग्रामपंचायती सर्वात मोठ्या आहेत. नर्मदा नगर येथे तब्बल सहा अंगणवाड्या आहेत. या सहाही अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बालकांना साधे नळ कनेक्शन नाही. त्यामुळे साहजिकच पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक ही वसाहत सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांची आहे. शिवाय सर्वात जुनी वसाहत आहे.
तळोदा तालुक्यातील ३५ अंगणवाड्यांमध्ये पाण्याचे नळ कनेक्शन नाही. जल जीवन मिशन योजनेतून तातडीने जोडणी करून देण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना पत्रदेखील दिले आहे. त्यामुळे लवकरच जोडणी करून देणार आहेत. - भाऊसाहेब बोरकर, बाल विकास अधिकारी, एकात्मिक बालविकास कार्यालय, तळोदा.