२५२ व्यक्तींच्या सेवेला ३११ कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:09 IST2020-05-06T12:09:17+5:302020-05-06T12:09:26+5:30

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि जिल्हाबाहेरुन आलेल्या व्यक्तींच्या विलगीकरणासाठी जिल्ह्यात १० ...

311 employees serving 252 persons | २५२ व्यक्तींच्या सेवेला ३११ कर्मचारी

२५२ व्यक्तींच्या सेवेला ३११ कर्मचारी

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि जिल्हाबाहेरुन आलेल्या व्यक्तींच्या विलगीकरणासाठी जिल्ह्यात १० क्वारंटाईन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षात सध्या २५२ व्यक्ती निगराणीखाली असून त्यांच्या सेवेला मात्र आरोग्य विभागातील ३११ कर्मचारी आणि डॉक्टर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे गेल्या आठवडाभरापासून स्थलांतरित हजारो मजूर जिल्ह्यात परतत असून या मजुरांसाठी पुरेशी व्यवस्थाच नसल्याने त्यांना आपल्या गावी होम क्वारंटाईनसाठी पाठविले जात आहे.
नंदुरबार जिल्हा लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात कोरोनामुक्त जिल्हा होता. पण दुसऱ्या टप्प्यापासून मात्र रुग्णांची संख्या वाढत गेली. सद्यस्थितीत १९ रुग्ण असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनासाठी आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून ६५६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यातील ५५२ स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तर ८३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डसह जिल्ह्यात १० ठिकाणी क्वारंटाईन कक्ष स्थापन केले आहेत. बाहेरुन आलेल्या व्यक्तीला अथवा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तीला खबरदारी म्हणून या कक्षात क्वारंटाईन करण्यात येते. त्याठिकाणी ९२० बेडची व्यवस्थाही करण्यात आली आहे. आतापर्यंत या वार्डांमध्ये ८७२ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ६२० जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत एकूण २५२ जण या क्वारंटाईन कक्षात आहेत. या कक्षातील व्यक्तींच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाने ३११ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. क्वारंटाईन कक्षात प्रत्येक व्यक्तीला दाखल होताच त्याला स्वतंत्र नवीन बेडशीट दिले जाते. तसेच रोज नाश्ता, जेवण आणि चहा दिला जातो. यासह आवश्यक अन्य सुविधाही प्रशासनामार्फत पुरविल्या जात आहेत. त्यासाठी शासनाने या केंद्रांसाठी ८० लाखांचा निधी वितरीत केला आहे. क्वारंटाईन कक्षातील खर्च हा त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांच्या निगराणीखाली असून जिल्ह्यातील सहाही तहसीलदारांना प्रत्येकी सहा लाखांचा निधी त्यासाठी दिला आहे. तर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला २० लाख, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला १० लाख, जिल्हा परिषदेला चार लाख आणि जिल्हा प्रशासन नगरविकास विभागाला १० लाखाचा निधी वितरीत केला आहे.
एकूणच कोरोनासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या कामाबाबत सर्वत्र समाधान असले तरी नंदुरबार आणि खापर येथील क्वारंटाईन कक्षातील घडलेल्या घटना मात्र तेथील प्रशासनाची बेपर्वाई दर्शविणारी असून ती चिंताजनक आहे.
सद्यस्थितीत स्थलांतरित मजुरांचा ओघ जिल्ह्यात सुरू झाला आहे. जिल्ह्यातील ४० हजारापेक्षा अधिक मजूर परराज्यात कामासाठी स्थलांतरित झाले होते. ते परतू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या मजुरांची प्राथमिक तपासणी करून त्यांना होमक्वारंटाईनसाठी पाठविले जात असल्याने दुर्गम-अतिदुर्गम भागात होमक्वारंटाईन असलेल्या या मजुरांची वेळोवेळी आरोग्य तपासणी व त्याची काळजी घेणे आव्हानच ठरणार आहे.

४क्वारंटाईन कक्षांमधील सोयी-सुविधा चांगल्या असल्याच्या प्रतिक्रिया तेथे वास्तव्यातील व्यक्तींच्या आहेत. विजेचा लपंडाव, त्यातून जाणवणारा पाणी प्रश्न या समस्या काही ठिकाणी आहेत.
४काही कक्षांमध्ये या काळात घडलेल्या घटना मात्र चिंताजनक आहेत. खापर येथील कक्षात एका तरुणाचा अपेंडीक्सने मृत्यू झाला होता. वास्तविक त्याला तात्काळ वैद्यकीय उपचार मिळाले असते तर घटना टाळू शकलो असतो. पण या घटनेतून लोकांमध्ये मात्र चर्चेला वाव मिळाला.
४दुसरी घटना म्हणजे नंदुरबार येथील कक्षातील एकाचा तपासणी अहवाल येण्यापूर्वीच त्याला सोडून देण्यात आले. त्यामुळे प्रशासनालाही प्रचंड ताण झाला. शिवाय सोडून दिलेल्या व्यक्तीचा संपर्कातील लोकांचा अहवाल अद्याप बाकी आहे. तीदेखील एक चिंताच आहे. ही घटनादेखील टाळता आली असती.

लॉकडाऊनच्या दुसºया टप्प्याच्या अखेर गुजरात सरकारने अचानक जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांना वाहनाने पाठविण्यास सुरुवात केल्याने सुरुवातीला जिल्हा प्रशासन भांबावले होते. अचानकपणे शेकडो मजूर जिल्ह्याच्या सीमेवर येऊन ठेपल्याने त्यांना क्वारंटाईन कुठे करावे हा प्रश्न प्रशासनासमोर होता. शिवाय महाराष्टÑ शासनाचेही त्याबाबतचे स्पष्ट निर्देश नव्हते. त्यामुळे गुजरात प्रशासन आणि महाराष्टÑ प्रशासन यांच्यात वादही झाला होता. गुजरातबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. पण त्यातूनच या मजुरांना तपासणी करून होमक्वारंटाईन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार गेल्या आठवडाभरात जवळपास १० हजार मजूर परतले आहेत. त्यांची तपासणी करून त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे.
या मजुरांना आल्यानंतर त्या त्या गावातील पोलीस पाटील व सरपंचांनी तसेच काही समाजसेवक व स्थानिक लोकप्रतिनिधींनी जेवणाची आणि घरापर्यंत ने-आण करण्याची सुविधा केली.
या मजुरांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात येत असून त्या त्या कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती, गट प्रवर्तक हे त्यांच्यावर लक्ष ठेवून राहणार आहेत.
मजुरांपैकी बहुतांश मजूर दुर्गम-अतिदुर्गम भागातील पाड्यात राहत असल्याने या मजुरांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणे प्रशासनासमोर आव्हानच आहे.

जिल्ह्यातील एकूण १२ लाख ८४ हजार ३२१ लाभार्थींना प्रशासनाने ३० हजार ९७़ ३८ मेट्रीक टन गहू आणि ६४ हजार २१६ मेट्रीक टन तांदूळाचे वाटप केले आहे़ एप्रिल महिन्यात अंत्योदय आणि कुटूंब लाभार्थींना या धान्याचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे़

Web Title: 311 employees serving 252 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.