जिल्ह्यातील २८ हजार शेतकऱ्यांना मिळू शकतो प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST2021-03-19T04:29:50+5:302021-03-19T04:29:50+5:30
नंदुरबार : महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांचे १८ कोटी ९२ लाखांचे कर्ज माफ झाले आहे. ...

जिल्ह्यातील २८ हजार शेतकऱ्यांना मिळू शकतो प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ
नंदुरबार : महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांचे १८ कोटी ९२ लाखांचे कर्ज माफ झाले आहे. यातून कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी नियमित कर्ज भरणारे २८ हजार ४१७ शेतकरी अद्यापही ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. हे शेतकरी शासन अनुदान देणार कधी, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
जिल्ह्यात गेल्या वर्षात जिल्हा बँकेकडून सुमारे सहा हजार ९९० शेतकऱ्यांना ८२ कोटी १० लाख तर राष्ट्रीयीकृत बँकांकडून १९२ कोटी रुपयांचे कर्ज एकूण २५ हजार ३६२ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. यंदाच्या वर्षातही बँकांना साधारण २०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य आहे; परंतु जिल्ह्यात घोषित झालेल्या प्रोत्साहन योजनेची अंमलबजावणी झालेली नसल्याने एप्रिल महिन्यापासून कर्ज घ्यावे किंवा नाही, या पेचात शेतकरी अडकले आहेत. यावर शासनाने तातडीने निर्णय देत प्रोत्साहन रक्कम द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी करत असून, वारंवार सहकार विभागाकडे चाैकशी करत आहेत. जिल्ह्यात २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी अभियानांतर्गत १६ हजार ७६४ शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. यात ९ हजार ४१३ हे नियमित कर्ज घेणारे व त्याचा परतावा करणारे शेतकरी असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे शेतकरी प्रोत्साहन योजनेला पात्र आहेत.
२५ हजार शेतकरी कर्जमुक्त
नंदुरबार जिल्ह्यातील एकूण २५ हजार २२ शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचे लाभार्थी आहेत. या शेतकऱ्यांचे १८ कोटी ९२ लाख रुपयांचे कर्ज शासनाने माफ केले आहे. या शेतकऱ्यांना येत्या काळात खरीप कर्ज मिळण्याच्या अडचणी दूर झाल्या आहेत. शेतकऱ्यांना एनओसी मिळाल्याने त्यांना तातडीने कर्ज मिळू शकेल.
सहकार विभागाकडे योजना
दरम्यान ही योजना सहकार विभागाकडे असल्याने शेतकरी त्याठिकाणी विचारणा करत आहेत. कृषी विभागाकडे प्रोत्साहन योजनेची कोणतीही माहिती नाही. शेतकऱ्यांच्या याद्याही सहकार विभागाने अपडेट केल्या आहेत.
सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रोत्साहन योजनेचा अद्याप जीआरच निघालेला नाही.