240 गावे व 210 पाडय़ांमध्ये टंचाई : नंदुरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:05 IST2018-11-15T13:05:23+5:302018-11-15T13:05:28+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईच्या पाश्र्वभुमीवर 240 गावे व 210 पाडय़ांना उपाययोजनांसाठी तब्बल 11 कोटी 32 लाख 86 ...

240 गावे व 210 पाडय़ांमध्ये टंचाई : नंदुरबार
नंदुरबार : जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईच्या पाश्र्वभुमीवर 240 गावे व 210 पाडय़ांना उपाययोजनांसाठी तब्बल 11 कोटी 32 लाख 86 हजार रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. त्यात 20 गावांना टँकर देखील प्रस्तावीत असून यात सर्वाधिक 18 गावे नंदुरबार तालुक्यातील आहेत. दरम्यान, 302 ठिकाणी विंधन विहिरी नव्याने करण्यात येणार आहेत.
यंदा सरासरीच्या तुलनेत 30 टक्के कमी पाऊस झाला आहे. शासनाने चार तालुके संपुर्ण दुष्काळी तर दोन तालुके अंशत: दुष्काळी जाहीर केले आहेत. सर्वच महसुली गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत देखील जाहीर झालेली आहे. या पाश्र्वभुमीवर आता पाणी टंचाईचे संकट देखील गडद होत चालले आहे. त्यावर तीन टप्प्यात उपाययोजना करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी 11 कोटी 32 लाख 86 हजार रुपयांचा खर्च येणार आहे.
यंदा 20 ठिकाणी टँकर
टँकरमुक्त जिल्हा म्हणून गेल्या 15 वर्षापासून नंदुरबारची ओळख होती. अपवाद फक्त धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील गौ:याचा बोदलापाडा या गावाचा. कारण तेथे उपाययोजना करूनही टँकरनेच पाणी पुरवावे लागत होते. यंदाच्या दुष्काळात मात्र 20 गावांना टँकर लागण्याची शक्यता आहे. अर्थात टंचाईची तीव्रता वाढेल त्याप्रमाणे त्यात आणखी वाढ देखील होऊ शकते. 20 गावांमध्ये सर्वाधिक 18 गावे ही नंदुरबार तालुक्यातील आहेत. तर दोन गावे ही धडगाव तालुक्यातील आहेत. नंदुरबार तालुक्यातील पुव्रेकडील अर्थात रनाळा मंडळाअंतर्गत असलेल्या गावांना टँकर सुरू करावे लागणार आहे.
88 खाजगी विहिरी
अधिग्रहण करणार
जिल्ह्यात एकुण 88 खाजगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक 63 विहिरी या नंदुरबार तालुक्यातील गावांमध्ये राहणार आहेत. त्या खालोखाल 21 विहिरी या शहादा तालुक्यातील गावांमध्ये, चार विहिरी या धडगाव तालुक्यातील गावांमधील असतील. याशिवाय 302 ठिकाणी नव्याने विंधन विहिरी देखील घेण्यात येणार आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यात 10, नवापूर तालुक्यात 12, शहादा तालुक्यात 88, तळोदा तालुक्यात 26, अक्कलकुवा तालुक्यात 31 तर धडगाव तालुक्यात सर्वाधिक 135 विंधन विहिरींचा समावेश आहे. तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना या 19 गावांमध्ये घेण्यात येतील. त्यात नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक 19 तर शहादा तालुक्यात तीन आणि नवापूर तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे.
याशिवाय 13 गावांमध्ये विहिर खोलीकरण, 22 गावांमध्ये प्रगती पथावरील पाणी पुरवठा योजनांची कामे पुर्ण केली जाण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने आराखडा देखील तयार केला आहे. संबधीत यंत्रणांना तशा सुचनाही दिल्या आहेत.