पीएम आवास योजनेच्या लाभाअभावी २३ हजार लाभार्थींचे संसार उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST2021-02-09T04:34:43+5:302021-02-09T04:34:43+5:30
नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून २०१६ - १७ या वर्षात १२ हजार ६३४ घरांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पण, ...

पीएम आवास योजनेच्या लाभाअभावी २३ हजार लाभार्थींचे संसार उघड्यावर
नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून २०१६ - १७ या वर्षात १२ हजार ६३४ घरांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पण, १६ हजार ७२७ लाभार्थींची नोंदणी होऊन ११ हजार ६४७ जणांची घरे पूर्ण झाली होती. या वर्षात केवळ ९८७ घरे अपूर्ण होती. २०१७-१८ या वर्षातही १५ हजार ६०१ घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट होते. १४ हजार २८० घरे या वर्षात पूर्ण करण्यात आल्याने १ हजार ३२१ घरे अपूर्ण होती. २०१८ - १९ या वर्षात १० हजार ३४७पैकी ८ हजार ८८० घरे पूर्ण करण्यात आल्याने १ हजार ५०७ घरे अपूर्ण होती. एकीकडे तीन वर्षात घरांचे उद्दिष्ट अधिक प्रगतपणे पूर्ण करण्यात आल्याने २०१९ - २० या वर्षात ५० हजार ८२० उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. दरम्यान, यातून ३० हजार ८५८ घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असले तरी अद्याप १९ हजार ९६२ घरांची कामे अपूर्ण आहेत. चार वर्षांच्या काळात २३ हजार ७७७ घरे अपूर्ण राहिल्याने त्याचा फटका थेट लाभार्थींना बसला आहे.
ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून थकीत रक्कम असलेल्या लाभार्थींना त्यांचा लाभ देण्याची तरतूद करत आहे. दोन दिवसात अक्कलकुवा येथील लाभार्थींना रक्कम प्रदान केली आहे. पुढे इतर तालुक्यातील रक्कम अदा करण्याचे काम होईल. टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थींना त्यांच्या रकमा देण्यावर भर देत आहे. प्रशासकीय कामकाजालाही गती दिली जात आहे. येत्या काळात सर्व लाभार्थींना योजनेचा लाभ मिळेल.
-पी. एस. लाटे, प्रभारी प्रकल्प संचालक, डीआरडीए, नंदुरबार.
स्वत:च केली तात्पुरती सुविधा
२०१९ - २० या वर्षात अक्कलकुवा तालुक्यात ४ हजार, धडगाव ३ हजार ८६२, नवापूर ४ हजार, शहादा ४ हजार, तर तळोदा तालुक्यात अडीच हजार घरकुले अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी या लाभार्थींना अनुदान न मिळाल्यास त्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. अनेकांनी घरावर ताडपत्री टाकण्यासह जुजबी पत्रे ठेवून तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.
प्रशासनाकडून तिसऱ्या टप्प्यातील निधी नुकताच प्राप्त झाला आहे. यामुळे पुढील कामाला सुरुवात केली आहे. परंतु शेवटच्या टप्प्यातील निधी मिळण्यास उशीर झाल्यास पुन्हा अडचणींचा सामना करावा लागेल.
- उदेसिंग आमशा पाडवी,
लाभार्थी, रांझणी, ता. तळोदा.