तळोदा तालुक्यातील २२ गावे कोरोनापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST2021-04-08T04:30:44+5:302021-04-08T04:30:44+5:30
तळोदा तालुक्यात ६७ गावे आहेत. तालुक्याची विभागणी पूर्व व पश्चिम भाग अशी केली जाते. पूर्व भागात गावांची संख्या पश्चिम ...

तळोदा तालुक्यातील २२ गावे कोरोनापासून दूर
तळोदा तालुक्यात ६७ गावे आहेत. तालुक्याची विभागणी पूर्व व पश्चिम भाग अशी केली जाते. पूर्व भागात गावांची संख्या पश्चिम भागापेक्षा अधिक आहे. शिवाय मोठमोठ्या गावांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना या जागतिक महामारीने संपूर्ण जगालाच ग्रासले आहे. पूर्वी शहरापुरत्या सिमीत असलेल्या कोरोना महामारीने आता ग्रामीण भागात मोठा धुमाकूळ घातला आहे. साहजिकच रुग्णांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर काही गावेच आपल्या कवेत घेतली आहेत. अशी वस्तुस्थिती असताना, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील पूर्व भागातील कोठार, चौगाव बुद्रुक, दसवड, धनपूर, खर्डी खुर्द, सावरपाडा, अलवण, कढेल, करडे, लाखापूर फाॅरेस्ट, लखापूर (महसूल), न्यूबन, बंधारा, रेवानगर, रोझवा, सलसाडी, तऱ्हावद, गंगानगर, तुळजा, काजीपूर, चौगाव खुर्द, खर्डी बुद्रुक अशा २२ गावांमध्ये अजूनही कोरोना महामारीचा शिरकाव गावकऱ्यांच्या सावध भूमिकेमुळे होऊ दिला नाही. तालुक्यात अशी ३५ गावे आहेत. अर्थात या गावांमधील रहिवाशांनी शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले होते. शिवाय गावाच्या चारही बाजूच्या सीमा सील केल्या होत्या. गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून बाहेरगावातील व्यक्तींवर लक्ष ठेवत होते. याशिवाय कोरोना महामारीबाबत गावकऱ्यांमध्ये सातत्याने जनजागृतीही करीत असत. येथील ग्रामपंचायत प्रशासनदेखील सातत्याने औषध फवारणीबरोबरच शासकीय उपाययोजनांच्या अंमलबजाणीसाठी प्रयत्न करीत असत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाला आपल्या गावाच्या वेशीपर्यंत रोखण्यात यश आल्याचे गावकरी सांगतात. पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी व गावातील आशा स्वयंसेविकादेखील घरोघरी जाऊन नियमितपणे कुटुंबांचे सर्वेक्षण करीत आहेत. त्यामुळे गावकरीही दक्ष राहतात.
विशेष म्हणजे यातील काही गावांच्या आजूबाजूची गावे कोरोनाने संक्रमित होत असतानाही गावे सुरक्षित असल्याचे गावकरी सांगतात. शिवाय आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील गावकऱ्यांचे लसीकरण केले आहे. ही सर्वच गावे १०० टक्के आदिवासी वस्ती असलेली आहेत. तसेच तेथील लोकसंख्याही हजार ते बाराशेपेक्षा अधिक आहे. सध्या कोरोनाचा मोठा विस्फोट वाढला असला, तरी आमचे गाव यापासून मुक्त राहण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील राहणार असल्याचे या गावांमधील ग्रामस्थांनी सांगितले.
प्रत्येकाने बाहेरून आल्यानंतर हात धुणे, बाहेर नियमित मास्क लावणे, मधुमेह, उच्च रक्तदाब, इतर आजारांची लक्षणे असलेल्या रुग्णांची चौकशी, नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी यासह ज्यांना सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असल्यास त्वरित ग्रामपंचायतीत संपर्क करणे आदींबाबत माहिती व जनजागृती करण्यात आल्यामुळेच कोरोनावर आतापर्यंत मात करण्यात आल्याचे गावकरी म्हणतात. अर्थात यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासन, अरोग्य या यंत्रणांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून घेतलेले परिश्रम याचेही फलित आहे.
या गावातील ग्रामपंचायतींनी शासनाच्या मार्गदर्शक नियमावलीचे तंतोतंत पालन केले आहे. शिवाय गावकऱ्यांमध्ये सातत्याने जनजागृती करण्यात आली आहे. गावांमध्ये नियमित औषध फवारणी करण्यात येऊन उपाययोजना केल्याने या गावांमध्ये कोरोनास अटकाव करण्यात यश आले आहे.
- बी. के. पाटील, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, तळोदा