जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे १३२ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:29+5:302021-07-02T04:21:29+5:30
लाॅकडाऊन काळात वीज मीटर रिडिंग घेण्यासाठी येणारे कर्मचारी नसल्याने नागरिकांनी मोबाईलमध्ये रिडिंग घेऊन ते पाठवण्याची सूचना केली होती. परंतु ...

जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे १३२ कोटींची थकबाकी
लाॅकडाऊन काळात वीज मीटर रिडिंग घेण्यासाठी येणारे कर्मचारी नसल्याने नागरिकांनी मोबाईलमध्ये रिडिंग घेऊन ते पाठवण्याची सूचना केली होती. परंतु या योजनेत केवळ १० टक्केच नागरिकांनी सहभाग घेतल्याने मार्च महिन्यापासून थकबाकीचे आकडे वाढण्यास सुरुवात झाली होती. यातून फेब्रुवारी महिन्यापर्यंत वीज ग्राहकांकडे थकीत असलेल्या २२ कोटींची रक्कम थेट १३२ काेटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही वसुली येत्या काळात कशी होणार, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. घरगुती वीजबिलांची रक्कम वाढल्याने नागरिकांकडून त्याचा भरणा करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. यातून वीज कंपनीचे कर्मचारी व ग्राहक यांच्यातील वाद टळणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून येत्या काळात वसुली मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकीकडे घरगुती वीजबिलांची रक्कम वाढत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील ५५ हजार ५०७ कृषिपंप ग्राहकांकडे ७४५ कोटी ३१ लाख रुपयांची एकूण थकबाकी असल्याची माहिती दिली गेली आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे २५८ कोटी ८० लाख माफ केले गेले आहेत. शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या ४८६ कोटी ५१ लाख रुपयांच्या रकमेतही ५० टक्के सूट देण्यात आली आहे. परंतु या उपक्रमालाही शेतकरी फारसा प्रतिसाद देत नसल्याची माहिती वीज कंपनीतील सुत्रांकडून देण्यात आली आहे.