नंदुरबार जिल्ह्यातील १११ संस्था अवसायनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST2021-04-25T04:30:34+5:302021-04-25T04:30:34+5:30
नंदुरबार जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक सहकारी संस्था सध्या कार्यरत आहेत. यातील ४४१ संस्थांचा निवडणूक कार्यक्रम गेल्या वर्षापासून रखडला आहे. ...

नंदुरबार जिल्ह्यातील १११ संस्था अवसायनात
नंदुरबार जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक सहकारी संस्था सध्या कार्यरत आहेत. यातील ४४१ संस्थांचा निवडणूक कार्यक्रम गेल्या वर्षापासून रखडला आहे. यातच नवीन सहकार कायद्यानुसार नियमांचा भंग करणाऱ्या १११ संस्था या अवसायनात गेल्याचे समोर आले होते. वर्षानुवर्षे सुरु असलेले आर्थिक गैरव्यवहार, संचालक मंडळांची बरखास्ती, आर्थिक अपहाराचे गुन्हे, फौजदारी कारवाई यासह विविध कारणांमुळे १११ सहकारी संस्था पूर्णपणे बंद पडल्या आहेत. यातून या संस्थांवर अवसायकांची नेमणूक करत त्यांचा लेखाजोखा तपासून त्या अवसायानात काढण्याची प्रक्रिया दीर्घ काळापासून सुरु आहे. यातून गेल्या सहा महिन्यांपासून तपासणीअंती केलेल्या कामाची तपासणी पूर्ण होत आली असून त्यानुसार कामकाज पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातून या संस्थांचे कामकाज येत्या काळात पूर्णपणे रद्द करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अवसायानात गेलेल्या संस्थांमध्ये गृहनिर्माण, सहकारी बहुउद्देशीय संस्था, दुग्धोत्पादन संघ, मजूर सोसायट्या तसेच सहकारी पतसंस्थांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक यांना संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. परंतु येत्या काही दिवसातच संस्था रद्द करण्याची कार्यवाही पूर्ण होणार असल्याची माहिती कार्यालयीन सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, एकीकडे १११ संस्थांचे कामकाज हे अवसायानात गेले असताना, दुसरीकडे ४४१ सहकारी संस्थांचा रखडलेला कार्यक्रम पुन्हा नव्याने सुरु होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने ३१ मार्चपर्यंत या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थागिती दिल्याचे आदेश होते. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गात या स्थगितीला मुदतवाढ मिळाल्याची माहिती आहे. यातून येत्या जून ते जुलैदरम्यान निवडणुकांची अधिसूचना नव्याने काढून निवडणूक कार्यक्रम राबवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.