होळी प्रभागातील पाणीपुरवठ्याचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:41 IST2018-03-09T00:41:46+5:302018-03-09T00:41:46+5:30
जुन्या नांदेडातील होळी प्रभागात सुरु असलेल्या पाणीपुरवठ्याच्या कामावर वापरले जाणारे चोरीचे असल्याच्या संशयावरुन इतवारा पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महापालिकेला सदर कामाची माहिती मागितली असता कोणतीही माहिती आतापर्यंत पोलिसांना देण्यात आली नाही. परिणामी होळी प्रभागातील पाणीपुरवठ्याचे काम मात्र ठप्प झाले आहे.

होळी प्रभागातील पाणीपुरवठ्याचे काम ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जुन्या नांदेडातील होळी प्रभागात सुरु असलेल्या पाणीपुरवठ्याच्या कामावर वापरले जाणारे चोरीचे असल्याच्या संशयावरुन इतवारा पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महापालिकेला सदर कामाची माहिती मागितली असता कोणतीही माहिती आतापर्यंत पोलिसांना देण्यात आली नाही. परिणामी होळी प्रभागातील पाणीपुरवठ्याचे काम मात्र ठप्प झाले आहे.
महापालिकेच्या प्रभाग १४ मध्ये दलित वस्ती निधीतून पाणीपुरवठा योजनेचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. हे काम सुरु असताना सदर पाईप हे चोरीचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ते जप्त करत एका प्लंबरला ताब्यातही घेतले. त्याच्याकडून पाईपाबाबत माहिती घेतली असता सदर पाईप निर्मलहून आणले असल्याचे सांगितले. त्यामुळे या सर्व प्रकरणात इतवारा पोलिसांनी निर्मल पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तेथील एका कंपनीचे पाईप असल्याचे स्पष्ट झाले. किती पाईप आहेत, ते कोणी आणले या सर्व प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी शुक्रवारी त्या कंपनीचे प्रतिनिधी नांदेडमध्ये येत आहेत. दरम्यान, इतवारा पोलिसांनी महापालिकेला या प्रकरणात मंगळवारी एका पत्राद्वारे माहिती मागितली होती. दोन दिवसांनंतरही कोणतीही माहिती महापालिकेने पोलिसांना दिली नाही.
महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सदर प्रकरणात काही गैर आढळल्यास संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करण्यात येईल, असे महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारणसभेत स्पष्ट केले आहे. तसेच चौकशीचेही आदेश दिले होते. ती चौकशी सुरु झाली की नाही? ही बाबही स्पष्ट झाली नाही.
होळी प्रभागातील पाणीपुरवठ्याचे काम थांबल्यामुळे नागरिकांची अडचण होणार आहे.
अभियंत्यांचे मौन
होळी प्रभागात सुरु असलेल्या कामाबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे व प्रभागात होणारे काम प्रत्यक्ष पाहण्याची जबाबदारी असलेले उपअभियंता रफतउल्ला खान यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणात त्यांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके वास्तव काय हा प्रश्न अनुत्तरितच आहे.