पाच दिवस दररोज पाणीपुरवठा
By Admin | Updated: October 21, 2014 13:31 IST2014-10-21T13:31:29+5:302014-10-21T13:31:29+5:30
महापालिकेने दिवाळी सणानिमित्त २१ ते २६ ऑक्टोबर या दरम्यान दररोज पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या विष्णूपुरी प्रकल्पात मुबलक पाणी असल्यामुळे एकदिवसआड पाणी सोडण्यात येत आहे.

पाच दिवस दररोज पाणीपुरवठा
>नांदेड : महापालिकेने दिवाळी सणानिमित्त २१ ते २६ ऑक्टोबर या दरम्यान दररोज पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या विष्णूपुरी प्रकल्पात मुबलक पाणी असल्यामुळे एकदिवसआड पाणी सोडण्यात येत आहे. दसरा व बकरी ईदनिमित्त दररोज पाणी सोडण्यात आल्याने दिवाळीलाही दररोज पाणी सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती.
सध्या सणोत्सवाचे दिवस असून २१ ऑक्टोबरपासून दिवाळीला प्रारंभ होत आहे. यावेळेस पाच दिवसांचा दिपावली उत्सव असल्याने दररोज पाणी सोडण्याची भूमिका मनपाने घेतली आहे. विष्णूपुरी प्रकल्पात १00 टक्के साठा असल्याने शहराला एक दिवसआड पाणी सोडण्यात येते. मात्र सणानिमित्त दररोज पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे, पाणी -पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
यंदा पाऊस ५0 टक्केच झाल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे आहे. विष्णूपुरी प्रकल्प शंभर टक्के भरल्याने नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली. मनपाला पुढील पावसाळ्यापर्यंत या पाण्यावरच नियोजन करावे लागणार आहे. शहरात सध्या एक दिवसआड पाणी सोडण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात मात्र दररोज पाणी सोडण्यात येत आहे. असे असले तरी नागरिकांनी पाण्याची बचत करून अपव्यय टाळावा, असे आवाहन मनपाच्या वतीने केले आहे.
दरम्यान, शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे. शहरातील अनेक ठिकाणी असलेले हातपंप पूर्णपणे बंद पडले आहेत. तर काही ठिकाणी पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होत असल्याचे पहावयास मिळत आहे. मनपा प्रशासनाने बंद पडलेले बोअर, हातपंप सुरु केल्यास नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. तशी मागणीही नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)