आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:01 IST2018-01-29T00:01:16+5:302018-01-29T00:01:52+5:30
येथील समाजकल्याण शासकीय मुलींच्या वसतिगृहातील बारावी वर्गात शिकणा-या विद्यार्थिनीने घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे व अभ्यास न झाल्यामुळे वसतिगृहातील खोलीमध्ये रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : येथील समाजकल्याण शासकीय मुलींच्या वसतिगृहातील बारावी वर्गात शिकणा-या विद्यार्थिनीने घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे व अभ्यास न झाल्यामुळे वसतिगृहातील खोलीमध्ये रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
मरडगा येथील करिश्मा किशनराव नरवाडे (वय १७) ही विद्यार्थिनी पंचशील विद्यालय हदगाव येथे शिक्षण घेत होती़ तिच्या वडिलांचा दहा वर्षांपूर्वीच मृत्यू झाला असून आई माहेरी राहते़ मामांनी तिचा सांभाळ केला़ इयत्ता आठवीपासून ती शिक्षणासाठी वेगवेगळ्या वसतिगृहामध्ये राहत असे़ शनिवारी करिश्मा आपल्या गावी मरडगा येथे गेली होती़ काका व काकीना बोलून आली़
समाजकल्याण विभागाचे हदगाव येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहामध्ये ६ वी ते १२ वीपर्यंत १०० मुली राहतात़ दीड महिन्यापासून येथील वॉर्डनचे पद रिक्त आहे़ २६ जानेवारी रोजी आडे यांनी एक दिवसासाठी पदभार स्वीकारला होता़ दरम्यान, आ़ नागेश पाटील आष्टीकर यांनी समाजकल्याण आयुक्तांना या ठिकाणी वॉर्डन देण्याची मागणी केली होती़
अंत्यविधी नवरीसारखा नटवून करावा..!
बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असून परीक्षेत मार्क कमी पडतील अशी भीती तिने मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये लिहिली आहे़ मला कोणाचाच आधार नाही़ मामाला माझ्यामुळे उगीच त्रास होतो़ त्यामुळे मी पुढे शिकूनही काय करू़ माझ्या लग्नाचा खर्च कोण करील, शिक्षणाचा खर्च कोण करील, असे प्रश्न तिच्या मनात येत असल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला़ करिश्माने आठ पानी चिठ्ठी लिहून ठेवली आहे़ त्यामध्ये माझा अंत्यविधी नवरीसारखा नटवून करावा़ माझे खूप स्वप्न होते;पण कोण पूर्ण करणार? असा प्रश्न तिने चिठ्ठीमध्ये विचारला आहे़ माझ्या मैत्रिणी खूप चांगल्या आहेत़ मामाही खूप चांगले आहेत़ कोणालाही जबाबदार ठरवू नये, असे लिहिले आहे.