अर्धापूर तालुक्यात करडई पीक नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST2020-12-28T04:10:26+5:302020-12-28T04:10:26+5:30

इसापूर धरणाचे पाणी उपलब्ध होण्यापूर्वी या भागात रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू आणि करडई पिकाची लागवड केली जात असे. ...

Safflower crop extinction in Ardhapur taluka | अर्धापूर तालुक्यात करडई पीक नामशेष

अर्धापूर तालुक्यात करडई पीक नामशेष

इसापूर धरणाचे पाणी उपलब्ध होण्यापूर्वी या भागात रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू आणि करडई पिकाची लागवड केली जात असे. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांच्या ६-१२ ओळीनंतर करडईचा एक-तीन ओळीत पेरा होत असे. रब्बी पिकांची निवड करताना कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या आणि अवर्षणाचा ताण सहन करणाऱ्या पिकांचा विचार केला जात असे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागात करडई पिकाची लागवड केली जात असे. तेव्हा सर्वात फायदेशीर पीक असायचे. मात्र, वर्तमानात करडई पिकाची लागवड होताना दिसत नाही. या पिकाचे क्षेत्र घटण्याची काही प्रमुख कारणे आहेत. पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव तसेच इतर स्पर्धात्मक पिके ज्वारी, सूर्यफूल व करडईचे बाजारभाव इतर पिकांच्या मानाने कमी असल्याने शेतकरी अधिक फायदा मिळणाऱ्या पिकांकडे वळला आहे.

करडई पीक अर्धापूर तालुक्यातून हद्दपार झाले आहे. आता रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा घेतला जात आहे. करडई पिकाच्या तुलनेत हरभरा जास्त उत्पन्न देणारे पीक ठरले आहे. कमी खर्चात आणि कमी वेळेत हरभरा जास्त उत्पन्न देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी करडई पिकाची लागवड थांबवली आहे आणि इसापूर धरणाचे पाणी अर्धापूर तालुक्याला मिळण्यास सुरुवात झाल्यावर शेतकरी बागायतदार झाला आहे. पाण्यामुळे मोठमोठी पिके घेण्यास सुरुवात झाली. यामुळे करडई पीक अर्धापूर तालुक्यातून नामशेष झाले आहे.

इसापूर धरणातून १९८५ ते १९८६ या काळात कॅनाॅलद्वारे शेतीला पाणी मिळण्यास सुरुवात झाली तेव्हा पाणी पाळ्या वीस दिवसांच्या अंतराने मिळत असत. पाणी पाळ्या कमी वेळात मिळत असल्याने कोरडवाहू शेतीही बागायती झाली. रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि ज्वारीचा पेरा वाढला. रब्बी हंगामात आठ ते दहा पाणी पाळ्या मिळू लागल्याने शेतकरी केळी, हळद आणि उसाची लागवड करू लागले होते. काही काळानंतर या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक केळी झाले. केळीपासून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास सुरुवात झाली. अनेक शेतकरी सधन झाले. शेतकऱ्यांनी अनेक पिकांत बदल घडवून आणला. भाजीपाल्यासह अन्य पिकांपासून उत्पादन काढण्यास सुरुवात केली. मात्र, करडई पीक या भागातून नामशेष झाले आहे.

Web Title: Safflower crop extinction in Ardhapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.