मागासवर्गीयांचे आरक्षण काढण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:35 IST2018-02-12T00:35:23+5:302018-02-12T00:35:29+5:30
भारतीय राज्यघटनेला सध्या धोका निर्माण झाला असून मागासवर्गीय समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा डाव हे सरकार करू पाहत आहे. या सरकारचा डाव आंबेडकरवादी जनतेनी ओळखला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ. धनराज डहाट यांनी केले.

मागासवर्गीयांचे आरक्षण काढण्याचा डाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : भारतीय राज्यघटनेला सध्या धोका निर्माण झाला असून मागासवर्गीय समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा डाव हे सरकार करू पाहत आहे. या सरकारचा डाव आंबेडकरवादी जनतेनी ओळखला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ. धनराज डहाट यांनी केले.
सत्यशोधक विचारमंच व फुले-आंबेडकर विचारधारा नांदेडच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डहाट बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले, उद्घाटक दीपक कदम, प्रा. फकरोद्दीन बेनुर, डॉ. बबन जोगदंड, स्वागताध्यक्ष सायलू म्हैसेकर, निमंत्रक डॉ. नागेश कल्याणकर, शीलवंत वाढवे, डॉ. विशाखा कांबळे, महापौर शीला भवरे, रमणी सोनवणे, डॉ. डी.टी. गायकवाड, विलास सिंदगीकर, किशोर भवरे, विजय सोंडारे, भीमराव हटकर, कोंडदेव हटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डहाट म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देताना सर्वप्रथम ओबीसी समाजाचा विचार केला होता. त्यानंतर इतर मागासवर्गीय समाजाचा त्यांनी विचार केला. सध्याचे सरकार मागासवर्गीय समाजाचे आरक्षण बाद करण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणारे कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आदींची हत्या झाली. ही बाब चुकीची असून समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले़
देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने परिवर्तन होईल. डॉ. आंबेडकरांचे विचार आणि आचार समजून घेतले पाहिजे. समाजाच्या विकासासाठी साहित्याची निर्मिती आवश्यक असल्याचेही डाहाट यांनी सांगितले.
प्रास्ताविक सत्यशोधक विचारमंचचे अध्यक्ष कोंडदेव हाटकर यांनी केले. त्यांनी १९९८ पासून साहित्य संमेलनाची केलेली सुरूवात त्यात लाभलेल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती याबद्दल सविस्तर माहिती देवून मागील संमेलनातील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. नागेश कल्याणकर यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराची गरज समाजाला असल्याचे सांगितले़
डॉ. दीपक कदम यांनी मागासवर्गीय समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असून ते वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले़
कार्यक्रमात सत्यशोधक समाज भूषण पुरस्काराने पत्रकार प्रशांत गवळे तर अॅड. विजय गोणारकर, कुंवरचंद मंडले आदींना सन्मानित करण्यात आले. यशस्वीतेसाठी एन.डी. गवळे, कोंडदेव हाटकर, श्रावण नरवाडे, निमंत्रण डॉ. नागेश कल्याणकर, एन.डी. डोंगरे, संजय जाधव, एम.डी. जोंधळे, एस. ढगे, एन. टी. पंडित, राजा गोडबोले आदींनी परिश्रम घेतले.