कासराळी : १३ जागांसाठी येथील ग्रामपंचायतीत होणाऱ्या निवडणुकीसाठी एका जागेसाठी एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज भरल्याने उमेदवारी ठेवायची तरी कोणाची, असा पेच येथील पॅनलप्रमुखांसमोर पडला. सहा महिन्यांपासून तयारीला लागलेल्या इच्छुकांवर येथे पॕॅनलप्रमुखाची मर्जी राहणे अवघड दिसत असल्याने साशंक असलेले शेवटच्या क्षणी बंडाच्या तयारीत आहेत. हे बंड मोडीत काढण्याचे आव्हान येथे आहे.
१३ सदस्यांची ग्रामपंचायत असलेल्या कासराळीत १३ जागेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर दि. ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. येथे असलेल्या दोन्ही गटांकडून १३ जागेसाठी ६७ उमेदवारांनी शेवटच्या दिवशी नामनिर्देशनपत्र दाखल केले. एका जागेसाठी जवळपास पाच उमेदवार येथे आहेत. यातील अनेकांनी गेल्या वर्षभरापासून तयारी करताहेत. आवश्यक ती कागदपत्रे जमवाजमव करून ग्रामपंचायतीची बेकीसाठी पैसे मोजले आहेत. मात्र येथे परंपरेप्रमाणे पॕॅनलनुसारच एक विरुद्ध एक असे उमेदवार असणार आहेत. १३ जागेसाठी २६ उमेदवार येथे अपेक्षित आहेत. मात्र आता ६७ उमेदवार येथे असल्याने कोणाची उमेदवारी कायम राहील हे सांगणे अवघड असले तरी पॕॅनलची सूत्रे हाती असलेल्या प्रमुखाची मर्जी राखणा-या उमेदवारालाच उमेदवारी मिळणार ही वस्तुस्थिती ही नाकारता येत नाही. गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या मात्र मर्जीत नसणा-या उमेदवारांचे स्वप्ने येथे अधांतरी आहेत. येथे त्यांना डावलणे अवघड होईल . निवडणूक लढवण्याच्या इराद्यावर ठाम असलेल्या अनेकांनी मी नसेल तर मला कोणी गृहीत धरु नये अशी उघड भूमिका घेऊन बंडाची भाषा उघडपणे करताहेत याचा फटका पॕनल प्रमुखांना बसेल असे दिसते. उमेदवारी नाकारणा-या उमेदवारांच्या बंडाचे आव्हान आता कासराळीत आहे. बंडोबांचे बंड थंड नाही झाल्यास याची किमत मोजावी लागणार हे निश्चित.