नव्या उमेदीने शेती करण्याची गरज - अंबुलगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST2021-07-02T04:13:35+5:302021-07-02T04:13:35+5:30

राज्य कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव ...

The need to cultivate with new hope - Ambulgekar | नव्या उमेदीने शेती करण्याची गरज - अंबुलगेकर

नव्या उमेदीने शेती करण्याची गरज - अंबुलगेकर

राज्य कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात १ जुलैरोजी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय समारोपात त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी आर. एस. कार्तिकेयन, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील-रावणगावकर, समाज कल्याण सभापती ॲड. रामराव नाईक, शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, माजी सभापती माधवराव मिसाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवशंकर चलवदे, काँग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष गोविंदराव शिंदे-नागेलीकर, जिल्हा परिषद सदस्य रोहिदास जाधव, भीमराव कल्याणे, मारोतराव लोखंडे, प्रा. डॉ. पंडागळे, प्रा. डॉ. देविकांत देशमुख, सचिन घाडगे आदींची उपस्थिती होती.

त्या म्हणाल्या, खरीप हंगामाच्या नियोजनासाठी जिल्हयाचे पालकमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले आहे. पीक कर्ज, पीक विमा आदींसाठी कृषी विभागाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. जिल्‍हयातील शेतक-यांना खताची कमतरता पडणार नाही, यासाठी प्रशासन सज्‍ज आहे. कोराना कालावधीत अनेकांनी वर्क फ्रॉम होम केले. परंतु शेतकऱ्यांना असा पर्याय नव्हता. त्यांना प्रत्‍यक्ष शेतात जाऊनच या काळात काम करावे लागले. त्‍यामुळे आपल्‍याला वेळेवर अन्‍न मिळाले आहे. आज अनेक शेतकऱ्यांनी उत्कृष्ट पिके घेऊन, नावीन्यपूर्ण शेती केल्‍यामुळेच त्‍यांना आज पुरस्काराने सन्‍मानित करण्‍यात येत आहे. यात महिला शेतकरीदेखील मागे नाहीत, याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असेही मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगितले.

कृषी क्षेत्राच्‍या माध्‍यमातून जिल्ह्याचा विकास अवलंबून असतो. शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून, बळीराजाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन बळीराजाच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले. पारंपरिक शेतीबरोबरच शेतक-यांनी नव तंत्रज्ञानाची जोड द्यावी. नव-नवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्याची दखल घेतली जाईल, असेही ठाकूर म्हणाल्या.

प्रारंभी राज्‍य शासनाच्या कृषी विभागाच्‍यावतीने देण्यात येणा-या विविध पुरस्कारांनी ४९ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील-रावणगावकर यांनी केले. याप्रसंगी समाज कल्याण सभापती रामराव नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, प्रा. डॉ. पंडागळे, प्रा. डॉ. देवीकांत देशमुख, सचिन घाडगे आदींची भाषणे झाली. यावेळी पुरस्‍कारप्राप्‍त शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कवडे, तर उपस्थितांचे आभार गजानन हुड्डेकर यांनी मानले. यावेळी कृषी विभागातील कृषी अधिकारी यांना त्यांच्या कामकाजासाठी लॅपटॉपचे वाटप करण्यात आले.

चौकट

कृषी विभागाच्‍यावतीने विविध योजना

आत्‍महत्‍याग्रस्‍त ११० शेतक-यांच्‍या कुटुंबियांना प्रत्‍येकी दहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्‍यात आले आहे. जिल्‍हा परिषद सेस निधीमधूनही शेतक-यांना विविध कृषी अवजारे देण्‍यात आली आहेत. शेतक-यांच्‍या उन्‍नतीसाठी कृषी विभाग तत्‍पर राहील, असे मत कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील-रावणगावकर यांनी केले.

चौकट

डॉक्‍टर डे निमित्‍त डॉक्‍टरांचा सन्‍मान

१ जुलै हा दिवस राष्‍ट्रीय डॉक्‍टर डे म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. याचे औचित्‍य साधून जिल्‍हा परिषद सभागृहात प्रातिनिधिक स्‍वरुपात जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. नीळकंठ भोसीकर, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. शिवशक्‍ती पवार, डॉ. अनिल रुईकर, डॉ. प्रवीण मुंडे आदींचा जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व पदाधिका-यांच्‍याहस्‍ते पुस्‍तक देऊन सत्‍कार करण्‍यात आला.

Web Title: The need to cultivate with new hope - Ambulgekar