जगणे यापुढेही नव्याने उगवत राहील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:21+5:302021-05-30T04:16:21+5:30
नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सकारात्मकता वाढावी या उद्देशाने सुरू केलेल्या मिशन पॉझिटिव्ह सोच अभियानाला आपली सकारात्मकतेचा शिदोरी त्यांनी दिली. ...

जगणे यापुढेही नव्याने उगवत राहील
नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सकारात्मकता वाढावी या उद्देशाने सुरू केलेल्या मिशन पॉझिटिव्ह सोच अभियानाला आपली सकारात्मकतेचा शिदोरी त्यांनी दिली. कोरोनाच्या या काळात आपल्या मानसिक तोलाला सावरणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण बाबीवर त्यांनी भाष्य केले. प्रगतीच्या नावाखाली आपण स्वत:ला, निसर्गाला, चराचराला केव्हा पारखे झालो हे कोणाच्या लक्षातही आले नाही. निसर्गाला काही परतही करावे लागते ही मूळ शिकवण आपण विसरून गेलो. आपल्या जगण्यावर भौतिक सुखाचे, मोहाचे चढलेले हे अनावश्यक पूट, थर लागत गेल्याने हा निगरगट्टपणा आला तर नसेल ना, असा प्रश्न बोरगावकर यांनी उपस्थित केला. कोरोना नावाच्या एका आजाराने ही सारी थरे आता गळून पडायला लागली आहेत. या १४ महिन्यांत जे काही घडले ते आजवरच्या इतिहासात घडले नाही. कदाचित भविष्यातही इतक्या कमी कालावधीत घडेल हे सांगता येत नाही. गरीब-श्रीमंत, जात-पात, लहान-मोठा अशी सारी काही अंतरे आपण मिटवू शकलो नाही ते बदल या अवघ्या १४ महिन्यांत घडले. एका-एका श्वासाची किंमत मानवाच्या लक्षात आली. एरवी प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याची नाळ कापल्याशिवाय त्याचा श्वास सुरू होत नाही. श्वासाचे हे तंतर नाळीपासून सुरू होते. नाळीशी असलेली आपली बांधीलकी आपण विसरून गेलो आहोत. त्याला भानावर आणणारा हा काळ असल्याचे ते म्हणाले. हा काळ गरजूंसाठी एक होऊन मदत करणारा, भुकेल्यांच्या ताटात अन्न पोहोचावे यासाठी जसे जमेल तसे काहीतरी करायला लावणारा काळ आहे. या काळाने खूप काही समज आणि उमज माणसाला दिली असे त्यांनी स्पष्ट केले. निसर्गाच्या हाका आपण ऐकल्या पाहिजेत. असा सल्लाही त्यांनी दिला. आपल्या आतला मानवतेचा झरा कधीही आटणार नाही एवढी काळजी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या काळाने दिलेली जी संवेदनेची ओल आहे ती सर्वदूर नदीच्या स्वभावाप्रमाणे हळूहळू झिरपत जाईल. चलो कायनात बॉट लेते, है तुम मेरे बाकी सब तुम्हारा ! या शब्दात मनोज बोरगावकर यांनी नवा विश्वास दिला.