७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायम करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST2020-12-28T04:10:12+5:302020-12-28T04:10:12+5:30
राज्यातील आरोग्य विभागात आजघडीला ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही संवर्गाची भरती ...

७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायम करण्याची मागणी
राज्यातील आरोग्य विभागात आजघडीला ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही संवर्गाची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे कोरोनासारख्या जागतिक महामारीत आरोग्य विभागाची सर्व यंत्रणा ढासळली. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर रुग्णालय आणि कोविड सेंटरची संख्या वाढवावी लागली. मात्र, त्या तुलनेत आरोग्य कर्मचारी कमी असल्यामुळे कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सेवक यासह इतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यात २० कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले होते. त्यासाठी सातशेहून अधिक जणांची नियुक्ती करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात बाहेर निघायलाही कुणी धजावत नसताना या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या आणि कुटुंबाच्या जिवाची काळजी न करता रुग्णांना जेवण देणे, औषध देणे, आंघोळ घालणे, त्यांचे बेडशीट धुणे यासह इतर कामे केली आहेत. यातील अनेकांना कोरोना झाला होता. कोरोनाची रुग्णसंख्या सप्टेंबरनंतर कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना कमी करण्यास सुरुवात करण्यात आली होती. आजघडीला मोजकेच कर्मचारी कर्तव्यावर आहेत.
समविचारी मंचचे राज्यभर आंदोलन
आरोग्य विभागातील जवळपास साडेआठ हजार रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. कोरोना काळात जोखीम पत्करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या भरतीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र समविचारी मंचने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येत आहे.