रोडगी येथे भिक्खू संघाच्या हस्ते बुद्ध विहाराचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:14+5:302021-05-30T04:16:14+5:30
तथागत गौतम बुद्ध यांनी समस्त जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला. सध्याच्या काळात जगापुढे कोरोनाचे महासंकट उभे राहिले असताना ...

रोडगी येथे भिक्खू संघाच्या हस्ते बुद्ध विहाराचे लोकार्पण
तथागत गौतम बुद्ध यांनी समस्त जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला. सध्याच्या काळात जगापुढे कोरोनाचे महासंकट उभे राहिले असताना मानवजातीच्या हितासाठी सर्वांनीच शिस्त, संयम, धैर्य याचा अवलंब करणे आवश्यक आहे. जगात दुःख कायम आहे, हे बुद्धाने सांगितले. त्याच्या निवारण्याचा उपायही सांगितला. बुद्ध धम्म जीवनाचा मार्ग दर्शवितो. धम्म म्हणजे नीती होय. नीतीचा विकास म्हणजेच दुःखाचे निरोधन आहे. दुःखावर मात करण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांचे विचार अंगीकारण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटकाळातही बुद्धाचे विचार मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन येथील साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी रोडगी येथे केले.
तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६५ व्या जयंतीनिमित्त अर्धापूर तालुक्यातील रोडगी येथे महामाया प्रजापती बुद्ध विहाराची स्थापना भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आली. बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना भंते सुदर्शन आणि भंते श्रद्धानंद यांच्या हस्ते झाली. गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प, दीप आणि धूपपूजन झाल्यानंतर बुद्ध विहाराचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. ढवळे म्हणाले की, वेळ, परिस्थिती बदलली, मात्र गौतम बुद्धांच्या विचारांना आपल्या जीवनात विशेष स्थान आहे. बुद्ध म्हणजे एक पवित्र विचार असून समर्पणाची भावना आणि जगण्याची आदर्श आचारसंहिता आहे. सूत्रसंचालन भुजंग लोणे यांनी केले. प्रास्ताविक शामराव लोणे यांनी, तर आभार निवृत्ती लोणे यांनी मानले. यावेळी दत्ता लोणे, हरी लोणे, हरी कोकरे, शंभुराज सोनाळे, गंगाबाई लोणे, राधाबाई लोणे, जयश्री कोकरे, वंदना कोकरे, अनुसया सोनाळे, राजश्री सोनाळे, शोभा सोनाळे, आशा कोकरे, सुनंदा कोकरे, धोंड्याबाई कोकरे, मनीषा कोकरे, विशाखा कोकरे, ज्योती लोणे, रत्नमाला लोणे आदींची उपस्थिती होती.