जमावबंदी आदेश लागू..... हॅलो दोनचा पट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST2021-01-01T04:12:52+5:302021-01-01T04:12:52+5:30
नांदेड : जिल्ह्यात सोमवार, ११ जानेवारी मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून कळविले आहे. सदर ...

जमावबंदी आदेश लागू..... हॅलो दोनचा पट्टा
नांदेड : जिल्ह्यात सोमवार, ११ जानेवारी मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून कळविले आहे. सदर आदेश २९ डिसेंबरपासून लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्य सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस अथवा शासकीय कर्मचारी, अधिकारी तसेच विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व सक्षम अधिकारी यांनी परवानगी दिलेल्या मिरवणुकांना हा आदेश लागू राहणार नाही.
चेंबर्समुळे अपघात वाढले
नांदेड : व्हीआयपी रस्ता ते गोकुळनगर स्थानक या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच स्टेडीयमसमाेर अनेक ठिकाणी रस्त्यापेक्षा चेंबर्स उंच झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी रस्ता खराब असल्याने खड्डा चुकविण्याच्या नादात वाहनचालक चेंबर्सवर धडकत आहेत. या भागातील चेंबर्स रस्त्याच्या बरोबरीने घेण्यासाठी रस्ता दुरूस्तीसह डांबरीकरण करण्याची गरज आहे. अन्यथा, एखाद्या वाहनधारकाचा नाहक बळी गेल्याशिवाय राहणार नाही.
भिजवणींच्या कामांना गती
नांदेड : यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने रब्बीतील पिकांना आवश्यक तेवढ्या पाणीपाळ्या देता येत आहेत. मागील काही दिवसांपासून थंडीचा कहर वाढला असला तरी दिवसा उन्हाची तीव्रता राहात आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्याचे काम शेतकऱ्यांकडून सुरू आहे. आजघडीला ऊसासह केळी, गहू, हरभरा भिजविण्यासाठी शेतकऱ्यांना जागलीला जावे लागत आहे. अनेक ठिकाणी केवळ रात्रीच वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना जागल करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
मद्यपींचा बंदोबस्त करा
नांदेड : शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या कॅनॉल रस्त्यावरील मद्यपींचा बंदोबस्त करण्यात भाग्यनगर पोलिसांना अपयश आले आहे. शेतकरी पुतळ्यापासून मालेगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी वाईन आणि बिअर शॉप आहेत. त्याचाच फायदा घेत मद्यपी दारू घेऊन कॅनॉल रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फुटपाथवर आपले बस्तान मांडत आहेत. नव्याने झालेल्या इमारतीच्या पाठीमागील बाजूस दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. याठिकाणी मद्यपी आपले बस्तान मांडून ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम करत आहेत.
स्वच्छतेकडे दुर्लक्षच
नांदेड : महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेचा गवगवा केला जात असला तरी अद्यापपर्यंत शहरातील बहुतांश ठिकाणी नाकाला रूमाल लावल्याशिवाय नागरिक पुढे जाऊ शकत नाहीत. अशी परिस्थिती व्हीआयपी रस्त्यावरील गोडाऊन परिसरात आणि राज कॉर्नर ते भाग्यनगर ठाणे रस्त्यावर आहे. याठिकाणी मद्यपी लघुशंकेस बिनदिक्कतपणे उभे राहतात. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिलांची कुचंबना होते. तसेच परिसरात दुर्गंधी पसरते. परंतु, याकडे महापालिका प्रशासनाचे कायम दुर्लक्ष राहिले आहे.
पुलाखाली अंधार
नांदेड : हिंगोली गेट पुलाखालून मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. परंतु, या ठिकाणी असलेले वीजदिवे मागील अनेक वर्षांपासून बंद आहेत. परिणामी रात्रीला याठिकाणी अंधार असतो. सदर पथदिवे आणि पुलाखाली बसविण्यात आलेली वीजदिवे नव्याने बसवून हा परिसर अंधारमुक्त करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. या ठिकाणी पाणी साचत असते, तसेच जाळ्या रस्त्याच्या वर आलेल्या आहेत. त्यामुळे अंधारात खड्डे आणि साचलेले पाणी लक्षात न आल्याने दुचाकीचालकांचे अपघात होत आहेत.
उच्च दाबाने पाणी सोडा
नांदेड : शहरालगत असलेल्या छत्रपती चौक ते डिमार्ट परिसरातील बहुतांश नगरांमध्ये उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी टँकर बोलवावे लागत आहेत. या भागातील पाणीपुरवठ्यासाठी लोकमित्रनगर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठे जलकुंभ उभारण्यात आले आहे. तरीदेखील या भागातील नागरिकांना उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीपट्टी का भरावी, असा प्रश्न सर्वसामान्य करदात्या नागरिकांना पडत आहे. त्यामुळे सिंधुनगर, सावित्रीबाई फुले नगर, बालाजीनगर आदी परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे.