कोट्यवधींच्या थकीत कर्जवसुलीसाठी तज्ज्ञांची समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:17 IST2021-04-18T04:17:29+5:302021-04-18T04:17:29+5:30
येथील शासकीय विश्रामगृहामध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह ही बैठक पार पडली. जिल्हा बँकेचे ६५८ कोटी रुपयांचे थकीत कर्ज येणे बाकी आहे. ...

कोट्यवधींच्या थकीत कर्जवसुलीसाठी तज्ज्ञांची समिती
येथील शासकीय विश्रामगृहामध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह ही बैठक पार पडली. जिल्हा बँकेचे ६५८ कोटी रुपयांचे थकीत कर्ज येणे बाकी आहे. त्यातील शेतीकर्ज फक्त १६.६७ कोटी असून, जिल्ह्यातील २० मोठ्या संस्थांकडे इतर कर्जे वसुलीअभावी बाकी आहेत. बँकेचा एनपीए तब्बल २९.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामध्ये १९४ कोटींचे कर्ज एनपीएमध्ये गेले आहे. जिल्ह्यातील संस्थांकडे असलेल्या या कर्जवसुलीसाठी चार तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशी सूचना चव्हाण यांनी केली. या समितीमध्ये बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, सनदी लेखापाल व उच्च न्यायालयातील एका ज्येष्ठ विधितज्ज्ञाचा समावेश करावा, असे सांगतानाच या समितीने सर्व कायदेशीर बाबी तपासून एक महिन्याच्या आत अहवाल द्यावा, असेही सांगितले. शासनस्तरावर साखर कारखान्याची घेतलेली थकहमी रक्कम वसूल करणे, कलंबर सहकारी साखर कारखाना विक्री प्रक्रियेचा पाठपुरावा करणे या बाबींकडे आपण लक्ष घालून हा प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज्यातील इतर चांगल्या बँकांचे अनुकरण करत जिल्हा बँकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी संचालकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही केले. बँकेच्या जिल्ह्यात एकूण ६४ शाखा असून, या सर्व शाखांमधील कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार योग्य त्या ठिकाणी नेमणुका करण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या. या बैठकीस आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्यासह संचालक उपस्थित होते.