अबब ! मनाठा येथील सरपंचाच्या घरात १५ साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:37 IST2018-07-05T00:36:14+5:302018-07-05T00:37:18+5:30
मनाठा येथील सरपंचाच्या घरी १५ साप निघाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते़ ग्रामस्थांनी पाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती़

अबब ! मनाठा येथील सरपंचाच्या घरात १५ साप
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : मनाठा येथील सरपंचाच्या घरी १५ साप निघाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते़ ग्रामस्थांनी पाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती़
सापाचे नाव काढले तरी अनेकांची बोबडी वळते़ परंतु आपल्या घरी एक किंवा दोन नाही तर चक्क १५ साप एकदाच निघाले तर काय होईल याची कल्पनाही मनात थरकाप उडविते़ नागीन सिनेमातल्या दृश्याप्रमाणे एकाच बिळातून तब्बल १३ साप (पिल्ले) बाहेर पडले़ सापाचा परिवारच तिथे राहत होता़
मनाठा येथील सरपंच दीक्षा नरवाडे यांच्या घरी दुपारी १२ च्या सुमारास नाग व नागीन जोडी निघाली़ त्यानंतर एकापाठोपाठ १३ पिल्ले चांगली हातभर लांबीची बिळातून बाहेर येत होती़ यामुळे सरपंचबाईच्या घरची मंडळी भांबावून गेली़ तर शेजारीपाजारी हे दृश्य पाहून चकीत झाले़ काही चमत्कार म्हणावा की दैवी शक्ती, कुणाला कळत नव्हते़ बातमी पसरताच बघ्यांची गर्दी वाढत गेली़
या दिवसामध्ये ग्रामीण भागात सापाचे दर्शन नेहमीच होते़ पण एवढ्या संख्येने मात्र नाही़ परिसरात प्राणिमित्र नसल्यामुळे या सापांना पकडण्याऐवजी जीवेच मारण्यात आले.