३६० जणांना एचआयव्हीची लागण
By Admin | Updated: July 28, 2014 00:59 IST2014-07-28T00:23:06+5:302014-07-28T00:59:39+5:30
हदगाव : तालुक्यात आयसीटीसी केंद्र २००६ पासून सुरू झाले.

३६० जणांना एचआयव्हीची लागण
हदगाव : तालुक्यात आयसीटीसी केंद्र २००६ पासून सुरू झाले. तेव्हापासून २५ जुलैपर्यंत १५ हजार नागरिकांनी तपासणी करुन घेतली असून आठ वर्षांत ३६० जणांना एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागातून मिळाली आहे.
तालुक्यात एकूण १४५ गावे असून २ लाख ६० हजार लोकसंख्या आहे. २१ व्या शतकात एचआयव्हीने आपला विळखा चांगलाच पसरविला आहे. या रोगापासून अलिप्त राहण्यासाठी जागतिक पातळीवर मोठी केंद्र सुरू करण्यात आली. विभागीय जिल्हा व तालुका पातळीवर ही केंद्र सुरू झाली. नॅको, (एनसीए), एमएसएस महाराष्ट्र स्टेट सोसायटी, डीएपीसीव्ही जिल्ह्यावर, आयसीटीसी तालुक्यावर ही केंद्र सुरू झाली.
गरोदर मातांना ही तपासणी अनिवार्य केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचत आहेत. या रोगाची तपासणी करण्यासाठी मोफत व सोपी पद्धत असूनही नागरिक आपल्या आरोग्याविषयी अनभिज्ञ आहेत. आपल्या गावात किंवा आजूबाजूला एचआयव्हीबाधित महिला किंवा पुरुष वावरत असून आपले त्यांच्याशी असुरक्षित यौन संबंध किंवा संक्रमित रक्तामधून आपल्या घरी हा रोग येऊ शकतो. त्यासाठी ही तपासणी करुन खात्री करणे गरजेचे असल्याचे डॉ. लोमटे यांनी सांगितले.
सध्या युवा पिढी जागरुक झाली असून सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातून मार्गदर्शन घेत आहे़ तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत़ यात्रा, प्रदर्शन, महाविद्यालयातूनही रोगाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात येतात़ त्यासाठी सामाजिक संस्थाची मदत घेण्यात येते़
एचआयव्ही आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी शासनाकडून व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात आली़ या आजाराचे दुष्परिणाम माहित झाल्याने अनेकजण खबरदारी घेतात़ परिणामी एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण घटले आहे़ (वार्ताहर)
अशी झाली वर्षनिहाय तपासणी
असुरक्षित यौनसंबंध, संक्रमित रक्त या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो. रक्तनिर्मिती करणाऱ्या पेशी नष्ट होवून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती लोप पावते़ तालुक्यात २००९ मध्ये २८१५, २०१०-२४५१, २०११-२९१२, २०१२-२३८३, २०१३-३२२६, २०१४-१५०० संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली़ यापैकी २००९-३५, २०१०-४९, २०१११-६१, २०१२-४९, २०१३-५८, २०१४-१५ लोकांना एचआयव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले़ जनजागृतीमुळे हे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते़