९७ ग्रामपंचायतीतील इच्छुकांचे २ हजार ३६७ नामनिर्देशनपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST2021-01-01T04:12:48+5:302021-01-01T04:12:48+5:30

कंधारः तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लढविण्यापूर्वीच गावपुढाऱ्यांची ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरतानाच मोठी अग्निपरीक्षा ठरत होती. ऑनलाईन फॉर्म भरत ...

2 thousand 367 nomination papers filed by aspirants in 97 gram panchayats | ९७ ग्रामपंचायतीतील इच्छुकांचे २ हजार ३६७ नामनिर्देशनपत्र दाखल

९७ ग्रामपंचायतीतील इच्छुकांचे २ हजार ३६७ नामनिर्देशनपत्र दाखल

कंधारः तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लढविण्यापूर्वीच गावपुढाऱ्यांची ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरतानाच मोठी अग्निपरीक्षा ठरत होती. ऑनलाईन फॉर्म भरत असताना नेट साथ देईना, वेळेत आपला क्रमांक येईना, थंडीची हुडहुडी कमी होईना आदीमुळे रात्र जागून काढण्याचा प्रसंग ओढावला.

चार दिवसात २ हजार ३६७ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केल्याचे समोर आले आहे. ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती.

तालुक्यातील ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गावपुढाऱ्यांत कमालीचा उत्साह संचारला. गावची सत्ता ताब्यात घेण्यासाठी राजकीय खलबते सुरू झाली. परंतु प्रत्यक्ष निवडणूक लढविण्यापूर्वीच अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यात पहिला दणका सरपंचाची झालेली आरक्षण सोडत रद्द झाली. त्यामुळे अनेकांनी गुडघ्याला घट्ट बांधलेले सरपंचाचे बाशिंग गळाले. सरपंचपद नेमके कुणासाठी राहणार हे गुलदस्त्यात असल्यामुळे गावचे राजकारण थंडावले होते. परंतु नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख जवळ आल्यानंतर गावचे राजकारण पुन्हा ढवळून निघाले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली. आणि ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरायला गेलेल्या इच्छुकांचा पुरता हिरमोड सुरू झाला. नेटची तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने तासन् तास ताटकळत बसण्याचा प्रसंग ओढवला. शेकडो जणांनी रात्र जागून काढली आणि उमेदवारी दाखल केली.

नामनिर्देशनपत्र भरलेली संख्या २३ डिसेंबर- निरंक, २४ डिसेंबर- १२, २८ डिसेंबर-२८६, २९ डिसेंबर- ७२२, ३० डिसेंबर १३४७. एकूण २,३६७. ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरताना उमेदवारांची होणारी दमछाक विचारात घेऊन ऑफलाईन उमेदवारी दाखल करण्यास २९ डिसेंबर रोजी मुभा देण्यात आली. वेळ वाढवून देण्यात आल्याने गावपुढाऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे ३० डिसेंबर रोजी गावपुढारी तणावमुक्त झाले. नामनिर्देशन पत्र दाखल करताना मोठी झुंबड उडाली. आणि एकाच दिवशी १ हजार ३४७ जणांनी उमेदवारी दाखल केली. उमेदवारी झालेल्या संख्येची माहिती संकलित करण्यास रात्री बराच उशीर झाला. तहसीलदार व्ही.बी.मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार विजय चव्हाण ,नायब तहसीलदार सूर्यकांत ताडेवाड,नायब तहसीलदार नयना कुलकर्णी, नायब तहसीलदार गिडे ,उत्तम जोशी ,मन्मथ थोटे , गंगाधर गोंटे आदींनी परिश्रम घेतले .छाननी उमेदवारी परत घेणे, चिन्ह वाटपानंतर निवडणूक प्रचाराचा ज्वर अधिक वाढेल असेच ग्रामीण भागातील राजकीय वातावरण आहे.

Web Title: 2 thousand 367 nomination papers filed by aspirants in 97 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.